जनशक्तीच्या जोरावर विकास कामांची स्वप्ने नक्कीच पूर्ण करू – मनसेचे प्रमोद गांधी
आबलोली (संदेश कदम):
जनता सुज्ञ असून तिला केवळ विकास हवा आहे. गुहागरमधील जनता धनशक्तीला झुकणार नाही, तर विकासालाच प्राधान्य देईल, असा ठाम विश्वास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांनी व्यक्त केला.
गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद जानवळकर उपस्थित होते.
प्रमोद गांधी पुढे म्हणाले की, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झाल्या असून महाविकास आघाडीच्या वतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, वंचित बहुजन आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रितपणे निवडणूक रिंगणात उतरले आहेत. या अनुषंगाने उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.
शृंगारतळी जिल्हा परिषद गटातून आदरणीय भास्करशेठ जाधव यांनी ही जागा माझ्यासाठी सोडल्याने मी स्वतः या गटातून निवडणूक लढवत असल्याचे प्रमोद गांधी यांनी सांगितले. तसेच शृंगारतळी पंचायत समिती गणातून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून संजय पवार, तर तळवली पंचायत समिती गणातून संदीप धनावडे हे उमेदवार निवडणूक लढवत असून आम्ही तिघेही एकत्रितपणे जनतेसमोर विकासाचा अजेंडा घेऊन उतरल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
धनशक्तीच्या विरोधात जनशक्तीचे आव्हान असल्याचे सांगत प्रमोद गांधी म्हणाले, “आमच्याकडे पैसा नसेल, पण आमच्याकडे जनता जनार्दन आहे. जनता आमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. आदरणीय भास्करशेठ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गुहागर तालुक्यात चांगला विकास सुरू आहे आणि त्याच धर्तीवर गावोगावी, खेडोपाडी आवश्यक असलेली सर्व विकासकामे आम्ही पूर्ण क्षमतेने पूर्ण करू.”
लोकांच्या विकासाची जी स्वप्ने आहेत, ती नक्कीच प्रत्यक्षात उतरवू, असा ठाम विश्वास मनसेचे तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांनी व्यक्त केला.















