रायवाडी शाळेच्या विद्यार्थ्यांचे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत दैदिप्यमान यश; संचिता वरवटकरची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड
रत्नागिरी :- निलेश रहाटे
चिपळूण–डेरवण येथे रत्नागिरी अॅथलेटिक्स असोसिएशन यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत रायवाडी शाळेचे विद्यार्थी तस्यम आलीम व निष्कर्षां वरवटकर यांनी सहभाग घेतला होता. तसेच रायवाडी शाळेच्या माजी विद्यार्थिनी संचिता वरवटकर आणि खंडाळा येथील श्रीमती पार्वती शंकर बापट स्कूलची विद्यार्थिनी अक्षरा आलीम यांनीही उल्लेखनीय कामगिरी केली.
या स्पर्धेत निष्कर्षां विनोद वरवटकर हिने ६० मीटर धावणे प्रकारात प्रथम क्रमांक पटकावला. तस्यम सचिन आलीम याने १०० मीटर धावणे प्रकारात तृतीय क्रमांक मिळवून यश संपादन केले. तसेच अक्षरा संतोष आलीम हिनेही उत्तम प्रयत्न करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
विशेष उल्लेखनीय कामगिरी करत संचिता वरवटकर हिने ६० मीटर धावणे प्रकारात प्रथम क्रमांक, तर ३०० मीटर धावणे प्रकारात द्वितीय क्रमांक मिळवला. या यशाच्या जोरावर संचिता हिची अहमदनगर (कोरेगाव) येथे दि. ७ व ८ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या महाराष्ट्र राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे खंडाळा शाळेतील डॉ. राजेश जाधव सर, बोरकर मॅडम तसेच रायवाडी शाळेच्या मुख्याध्यापिका महामाया सुर्वे मॅडम व सहाय्यक शिक्षक प्रतीक माने यांचे विशेष कौतुक होत आहे. यासोबतच आजी-माजी शाळा व्यवस्थापन समिती, सर्व पालकवर्ग व ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल अभिनंदन व शुभेच्छा दिल्या आहेत.















