‘अनुलोम संगम-2026’ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती; राष्ट्रनिर्मितीसाठी समर्पित स्वयंसेवकांचे कौतुक
येवला, नाशिक येथे कापसे फाऊंडेशनतर्फे आयोजन; समरस आणि भेदभावरहित समाजनिर्मितीचे कार्य प्रेरणादायी – मुख्यमंत्री फडणवीस
येवला (नाशिक) :
राष्ट्रनिर्मितीचा वसा जोपासणाऱ्या अनुलोम परिवाराच्या कार्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुक्तकंठाने कौतुक केले. येवला, नाशिक येथे अनुगामी लोकराज्य अभियानांतर्गत कापसे फाऊंडेशनच्या वतीने आयोजित ‘अनुलोम संगम-2026’ या भव्य कार्यक्रमाला मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवली.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, देशाच्या विकासासाठी समर्पणाची भावना अत्यंत महत्त्वाची आहे आणि अनुलोमचे स्वयंसेवक हीच भावना मनात ठेवून कार्य करत आहेत, ही बाब अत्यंत प्रेरणादायी आहे. स्वामी विवेकानंद यांनी मांडलेल्या विचारांनुसार समाजातील अडचणी दूर करण्याचे कार्य अनुलोमच्या माध्यमातून प्रभावीपणे होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
अनुलोम संस्थेने समाजातील विविध क्षेत्रांतून नेतृत्व घडवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य हाती घेतले असून, प्रगतिशील, समरस आणि एकजूट समाज उभारण्यात अनुलोमचे योगदान मोलाचे असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. विविध उपक्रमांद्वारे भेदभावरहित समाजनिर्मितीचा प्रयत्न सुरू असून, ‘संवादिनी’ उपक्रमातून ५०० महिला स्वयंसेवकांचा सहभाग हे समरसतेचे उत्तम उदाहरण असल्याचे त्यांनी सांगितले.
अनुलोमच्या प्रत्येक स्वयंसेवकाचे समाजातील योगदान महत्त्वाचे असून, हा परिवार अधिक व्यापक व्हावा आणि राष्ट्रनिर्मितीसाठी अनुलोमचे कार्य अधिक प्रभावीपणे पुढे जावे, अशा शुभेच्छा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.
कार्यक्रमादरम्यान पद्मश्री श्रीरंग लाड, कापसे पैठणी उद्योग समूहाचे संस्थापक बाळकृष्ण कापसे तसेच अनुलोमच्या कार्यात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या विविध जनसेवकांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
यावेळी मंत्री गिरीश महाजन यांच्यासह विविध मान्यवर, पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने स्वयंसेवक उपस्थित होते.












