आंगले गावच्या मागण्यांकडे महावितरणचे दुर्लक्ष? तीन वर्षांपासून पाठपुरावा, तरीही काम ठप्प!
प्रतिनिधी :- निलेश रहाटे
राजापूर तालुक्यातील मौजे आंगले येथील ग्रामस्थांचा संताप आता उफाळून आला आहे. सामाजिक कार्यकर्ते विलास गोपाळ राऊत यांनी अनेक वेळा महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित (महावितरण) कार्यालयाकडे निवेदन देऊनही ठोस कारवाई होत नसल्याची खंत व्यक्त केली आहे.
गावातील राऊतवाडी आणि वरची राऊतवाडी या दोन्ही वाड्यांमध्ये सध्या फक्त टू-फेस वीज लाईन आहे. कमी विद्युत दाबामुळे घरगुती उपकरणे चालत नाहीत, दिव्यांचा प्रकाश अत्यंत मंद आहे आणि ग्रामस्थांना रोजच्या जगण्यात मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे तातडीने थ्री-फेस लाईन जोडण्याची मागणी करण्यात आली आहे.
इतकेच नव्हे तर, ग्रामपंचायत आंगले हद्दीतील सौंदाळकरवाडी व राऊतवाडी यांच्या मधोमध असलेला डीपी ट्रान्सफॉर्मर अतिशय अडचणीच्या ठिकाणी बसविण्यात आला आहे. तो रस्त्यापासून तब्बल ६०० मीटर अंतरावर असून तिथे जाण्यासाठी अरुंद पायवाट आहे. बिघाड झाल्यास मनुष्यबळाने साहित्य वाहून न्यावे लागते. अपघात किंवा तातडीची परिस्थिती निर्माण झाल्यास वीजपुरवठा बंद करण्यासाठी मोठा धोका पत्करावा लागतो.
ग्रामस्थांनी वारंवार निवेदने दिली, लोकप्रतिनिधींची शिफारस पत्रे जोडली, तरी प्रस्ताव मंजूर का होत नाही? प्रस्ताव जिल्हा नियोजनकडे जातो आणि पुन्हा महावितरणकडे परत पाठवला जातो, असे का? यामागे नेमका दोष कुणाचा — महावितरणचा की जिल्हा नियोजन प्रशासनाचा? असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
नवीन ट्रान्सफॉर्मर देण्याची मागणीही गेली तीन वर्षे प्रलंबित आहे. “आम्ही सहकार्य करत आलो, निवेदने दिली, पाठपुरावा केला; तरी प्रशासन जागे होणार कधी?” असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते विलास राऊत यांनी माध्यमांशी बोलताना उपस्थित केला.
आंगले गावकऱ्यांचा स्पष्ट इशारा आहे — आता केवळ आश्वासने नकोत, तर तात्काळ ठोस निर्णय आणि कामाची अंमलबजावणी हवी!














