लांजा-भांबेड परिसरात काजू पिकाचे मोठे नुकसान; तातडीच्या पंचनाम्याची मागणी
रत्नागिरी :- निलेश रहाटे
रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा-भांबेड परिसरात दि. २७ मार्च २०२६ रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे व वादळामुळे गावात काजू पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या पावसासोबत जोरदार वाऱ्यामुळे काजूच्या झाडांवरील मोहर (फुले) मोठ्या प्रमाणात गळून पडला असून अनेक झाडांच्या फांद्या तुटल्या आहेत. काही ठिकाणी तर झाडे मुळासकट उपटून पडल्याचेही चित्र दिसत आहे . त्यामुळे झालेल्या नुकसान मूळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.
या भागात काजू हे प्रमुख नगदी पीक मानले जाते. सध्या काजू हंगामाच्या महत्त्वाच्या टप्प्यावर असताना झालेल्या या पावसामुळे पुढील उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अनेक शेतकऱ्यांच्या बागांमध्ये पिकावर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याचीही भीती निर्माण झाली आहे.
भांबेड येथील शेतकरी दिपक आंब्रे यांनी सुमारे 100 काजूची लागवड केली होती. मात्र या अवकाळी पावसामुळे त्यांच्या बागेतील 50/60 झाडांवरील मोहर मोठ्या प्रमाणात गळून पडला असून काही झाडांच्या फांद्या तुटल्या तसेच काही झाडे मुळासकट उपटून पडली आहेत. त्यामुळे त्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.
स्थानिक शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तातडीने पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. तसेच कृषी विभागाने त्वरित पाहणी करून शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन व मदत करावी, अशीही मागणी होत आहे.
दरम्यान, या अवकाळी पावसामुळे आधीच वाढलेल्या उत्पादन खर्चात आणखी भर पडली असून शेतकरी आर्थिक संकटात सापडण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे शासनाने लवकरात लवकर मदतीचा हात द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.













