रत्नागिरीत झोपडपट्टी पुनर्वसन ग्रीन प्रकल्प; 735 कुटुंबांना मोफत घरे
पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांची घोषणा; साडेतीन एकरावर 11 इमारती, प्रत्येकाला 16 लाखांची सदनिका
वार्ताहर-
रत्नागिरी : शहरातील झोपडपट्टीधारकांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. रत्नागिरी नगरपरिषद हद्दीतील 735 झोपडपट्टीधारकांना साडेतीन एकर जागेवर उभारण्यात येणाऱ्या झोपडपट्टी पुनर्वसन ग्रीन प्रकल्पांतर्गत मोफत घरे देण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत हा निर्णय जाहीर करण्यात आला. या बैठकीला नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, जि.प. उपाध्यक्ष विलास चाळके, मुख्याधिकारी वैभव गारवे, नगरसेविका वर्षा ढेकणे आणि नगरसेवक बंड्या साळवी यांची उपस्थिती होती.
प्रकल्पाअंतर्गत साडेतीन एकर जागेवर एकूण 11 इमारती उभारल्या जाणार असून, 735 झोपड्यांमधील सुमारे 3383 नागरिकांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. प्रत्येक लाभार्थ्याला सुमारे 386 चौरस फुटांची सदनिका मोफत दिली जाणार असून, सध्याच्या बाजारभावानुसार या घराची किंमत सुमारे 16 लाख रुपये आहे.
या ग्रीन प्रकल्पामध्ये वाहनतळासह विविध मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. तसेच, झोपडपट्टीधारकांना केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा यासाठी त्यांची कामगार नोंदणी करण्याचे निर्देशही डॉ. सामंत यांनी दिले.
दरम्यान, जिल्ह्यात प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर नियंत्रण आणण्यासाठी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी कठोर मोहीम राबवून दंडात्मक कारवाई करावी, असे निर्देशही यावेळी देण्यात आले.
या प्रकल्पामुळे झोपडपट्टीधारकांना सुरक्षित, सुसज्ज आणि सन्मानाने राहण्याची संधी मिळणार असून, रत्नागिरी शहराच्या विकासाला नवे रूप मिळणार आहे.















