चिपळूणमध्ये उड्डाणपुलाच्या कामाची आमदार भास्कर जाधव यांची पाहणी; पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश
बहादुरशेख नाका दुर्घटनेनंतर सुरक्षा उपाययोजनांवर भर; दर्जेदार साहित्य वापरण्याच्या सूचना
चिपळूण : मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील बहादुरशेख नाका येथे सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामाची आमदार भास्कर शेठ जाधव यांनी प्रत्यक्ष पाहणी करून कामाचा आढावा घेतला. दोन वर्षांपूर्वी याच ठिकाणी उड्डाणपुलाचा एक मोठा भाग गर्डरसह कोसळल्याची गंभीर घटना घडली होती. त्या पार्श्वभूमीवर भविष्यात अशा प्रकारची दुर्घटना टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे का, याची सविस्तर माहिती त्यांनी अधिकाऱ्यांकडून घेतली.
पुलाच्या बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्याचा दर्जा, कामाची गती आणि सुरक्षाविषयक उपाययोजना यांचा त्यांनी बारकाईने आढावा घेतला. तसेच येत्या पावसाळ्यापूर्वी हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यासाठी काम गतीने पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या.
यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य विक्रांत जाधव, चिपळूण रोट्रॅक्ट क्लबचे अध्यक्ष बाळा आंबुर्ले, नगरसेवक विकी नारळकर, फैसल कास्कर आदी उपस्थित होते.
तसेच राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उपअभियंता नाजीम मुल्ला, शाखा अभियंता शाम खुनेकर, ब्लूम कंपनीचे टीम लीडर वाय. एस. राव, स्ट्रक्चरल इंजिनियर अमोल कारंडे, ब्रिज इंजिनियर अर्जुन छत्तोराय, प्रोजेक्ट मॅनेजर सातपुते आणि सुरक्षा अधिकारी शहाबुद्दीन रशीद यांच्यासह इतर अधिकारीही यावेळी उपस्थित होते.
















