शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना शालेय दप्तरांचे वाटप : आदर्श सेवा मंडळ पन्हळेचा स्तुत्य उपक्रम
राजापूर/पन्हळे :- शाळेच्या पहिल्याच दिवशी, दि. 15 जून 2026 रोजी, जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा पन्हळे तर्फ राजापूर येथे आदर्श सेवा मंडळ पन्हळे ग्रामीण व मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने एक प्रेरणादायी उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमांतर्गत अंगणवाडी तसेच इयत्ता 1ली ते 7 वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत शालेय दप्तरांचे वाटप करण्यात आले. नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी शाळेत आलेल्या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर या दप्तरांमुळे आनंद फुलला. शाळेत येण्यासाठी मुलांना प्रोत्साहन मिळावे, शिक्षणाची गोडी लागावी आणि पालकांवरील आर्थिक भार हलका व्हावा, या उदात्त हेतूने हा उपक्रम राबवण्यात आला. दप्तर मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य संचारले असून त्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे, कारण एक दप्तर केवळ पुस्तकांसाठी नाही, तर ते मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी दिलेले बळ आहे. या कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक शेलार गुरुजी, शेलार मॅडम व बाणे गुरुजी यांच्यासह सर्व शिक्षकवृंद उपस्थित होता. आदर्श सेवा मंडळाचे ग्रामीण अध्यक्ष हरिश्चंद्र अनंत सोगम, उपाध्यक्ष रोहिदास हरी मांजरेकर, सचिव सीताराम पांडुरंग शिंदे, सहसचिव अमोल रमेश सोगम, गावकार केशव हरी सोगम यांच्यासह दत्ताराम सोगम, संदीप शिवगण, दत्ताराम गुरव, जानू मांजरे, पांडुरंग सोगम, नितीन गुरव, सौरभ शिंदे, पारस सोगम व मंडळाचे इतर ग्रामीण सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सामाजिक उपक्रमासाठी आदर्श सेवा मंडळ मुंबईचे अध्यक्ष विजय हरी मांजरे, उपाध्यक्ष रवींद्र शिवगण, सचिव महेंद्र कुमार गुरव, सहसचिव सुहास शिवगण यांच्यासह मुंबईतील सर्व पदाधिकारी व सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. गावातील व मुंबईतील चाकरमान्यांनी एकत्र येऊन शिक्षणासाठी दिलेला हा हातभार संपूर्ण तालुक्यासाठी आदर्शवत ठरला आहे. मुख्याध्यापक शेलार गुरुजी यांनी आदर्श सेवा मंडळाच्या या सामाजिक बांधिलकीचे कौतुक करत आभार मानले आणि अशा उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यास मदत होते व त्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा मार्ग सुकर होतो, असे मत व्यक्त केले.
बातमीदार प्रशांत पोवार, पन्हळे














