राज्यात थंडीचे प्रमाण वाढणार; पश्चिम महाराष्ट्रासह कोकण, विदर्भ, मराठवाड्यात गारठा वाढला

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

राज्यात थंडीचे प्रमाण वाढणार; पश्चिम महाराष्ट्रासह कोकण, विदर्भ, मराठवाड्यात गारठा वाढला

पुणे– राज्याच्या हवामानात गेल्या काही दिवसांपासून मोठा बदल होत आहे. काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात थंडी पडत आहे तर काही ठिकाणी तापमानात वाढ होत आहे. दरम्यान, पुढील काही दिवस थंडीचे प्रमाण वाढणार आहे. विदर्भात कडाक्याची थंडी पडली आहे. सर्वाधिक कमी तापमान गोंदिया व नागपूर जिल्ह्यात नोंदवले गेले. या दोन्ही जिल्ह्यात ९.८ डिग्री सेल्सिअस तापमान नोंदवल्या गेले. १५ डिसेंबर पर्यंत राज्यात तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुन्हा तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.

पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार आज तीव्र कमी दाबाचे क्षेत्र मन्नारचे आघात येथे स्थित आहे. तसेच त्याची वाटचाल वायव्य दिशेने होत असून पुढील १२ तासांत त्याची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे. राज्यातील चारही विभागात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. तसेच कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात पुढील चार पाच दिवसात २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे. तर विदर्भात मात्र फारसा बदल होणार नाही. पुण्यात पुढील तीन दिवस म्हणजेच १५ डिसेंबर पर्यंत आकाश मुख्यत: निरभ्र राहण्याची शक्यता आहे. व सकाळी धुके पडण्याची शक्यता आहे. तर पुढील काही दिवस म्हणजेच १६ ते १८ डिसेंबर पर्यंत हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. तसेच तापमान १ ते २ डिग्रीने वाढण्याची शक्यता आहे. मुंबईत गेले अनेक दिवस ढगाळ वातावरण असल्यामुळे तापमान वाढलेले होते. मात्र, यंदा गेल्या ९ वर्षातील सर्वात जास्त आणि सर्वात कमी तापमान मुंबईत नोंदवल्या गेले.

सध्या मुंबईसह उपनगर आणि ठाणे, पालघर, नवी मुंबई या शहरांमध्ये गारठा वाढणार आहे. पुढील काही दिवस मुंबईत व उपनगरात आकाश मुख्यतः निरभ्र राहणार आहे. तर कमाल तापमान २६ अंश सेल्सिअस व किमान तापमान २२ अंश सेल्सिअस इतके राहणार आहे. गेल्या दोन दिवसांत मुंबईच्या तापमानात घट झाली आहे. कोकणात देखील थंडी वाढली आहे. फेंगल चक्रीवादळामुळे कोकणातील थंडी गायब झाली होती. परंतु, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये थंडी पडण्यास सुरुवात झाली आहे. विदर्भात सुद्धा थंडीचा जोर वाढला आहे. विदर्भात गोंदिया, नागपुर जिल्ह्यात तापमानात कमी झाले आहे. तर अमरावती येथील चिखलदरा येथे तापमान ६ डिग्री सेल्सिअसवर आले आहे. विदर्भातील काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी धुक्यासह ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे. विदर्भातील अमरावती, अकोला, वर्धा, बुलढाणा, चंद्रपूर, भंडारा या सर्व जिल्ह्यातील किमान तापमान १० डिग्री सेल्सिअसच्या आसपास आहे. तर सर्वात कमी तापमान गोंदिया जिल्ह्यात नोंदवलं गेलं आहे.

Team Ratnagiri Vartahar
Author: Team Ratnagiri Vartahar

Official Ratnagiri vartahar Media creators & RV News YouTube Channel.

Leave a Comment

आणखी वाचा...