पालकमंत्री उदय सामंत यांच्याहस्ते  ७६ व्या प्रजासत्ताक दिनी ध्वजवंदन

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

 

पालकमंत्री उदय सामंत यांच्याहस्ते  ७६ व्या प्रजासत्ताक दिनी ध्वजवंदन

 

कशेळी गाव होणार संपूर्ण सौर ऊर्जेवर; धिरुभाई अंबानी डिफेन्स क्लस्टरमधून बंदुकांची निर्मिती रत्नागिरीमध्ये-पालकमंत्री उदय सामंत

 

रत्नागिरी– धिरुभाई अंबानी डिफेन्स क्लस्टरमधून सैनिकांच्या हातातील बंदुका रत्नागिरीमध्ये निर्मिती होणार आहेत. विजेच्या बाबतीत ग्रामपंचायतींना सक्षम करण्याचे काम राज्यात प्रथमच गोळप सौर प्रकल्पाने केले आहे. दुसरा प्रकल्प गुहागरमध्ये मूर्त स्वरुप घेत आहे. कशेळी हे संपूर्ण गाव सौर ऊर्जेवर करण्यात येणार आहे, असे सांगतानाच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पुढेही सुरु राहणार असल्याचे पालकमंत्री उदय सामंत म्हणाले.

 

छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियममध्ये मुख्य शासकीय सोहळ्यात देशाच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री श्री. सामंत यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकवून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. यावेळी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी आदींसह विभागप्रमुख उपस्थित होते. पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले, सोहळ्यास उपस्थित सन्माननीय स्वातंत्र्य सैनिक, त्यांचे कुटुंबीय, लोकप्रतिनिधी, अधिकारी तसेच कर्मचारी, पत्रकार मित्र आणि जिल्ह्यातील सर्व नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या सर्वप्रथम मी मन:पूर्वक शुभेच्छा देतो. जगात सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या आपल्या भारत देशाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून मजबूत केले आहे. समाजवादी, धर्मनिरपेक्ष, न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मुल्यांवर आपल्या देशाची गतिमान पाऊले पडत आहेत. सर्वसामान्य नागरिक हा आपल्या लोकशाहीचा, विकासाचा केंद्रबिंदू आहे. देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या देशाचा दबदबा जगात वाढत चालला आहे.

 

सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना चालू आर्थिक वर्षाचा रू. 360 कोटी इतका मंजूर अर्थसंकल्पीय नियतव्यय असून, जिल्ह्याच्या विकासावर तो 100 टक्के खर्च होईल. राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांच्या नेतृत्त्वाखाली दावोस येथे 15 लाख 70 हजार कोटींचे सामंजस्य करार करण्यात आले. त्यापैकी 40 हजार कोटींचे सामंजस्य करार रत्नागिरी शहरासाठी आहेत. त्यामुळे 25 ते 30 हजार युवक-युवतींना आता रोजगार उपलब्ध होणार आहे. रत्नागिरी जिल्हा हा पर्यटनाच्यादृष्टीने अतिशय महत्त्वाचा जिल्हा आहे. पर्यटनाचे वेगवेगळे प्रकल्प जिल्ह्यात व्हावेत, अशी सर्वांची इच्छा होती. कोट्यवधी रुपये खर्च करुन जिल्ह्यामध्ये पर्यटन स्थळे विकसित होत आहेत. तालुकाच्या ठिकाणी शिवसृष्टी ही संकल्पना महाराष्ट्रात प्रथम जिल्ह्यात उदयास आली. दापोली, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर याठिकाणी शिवसृष्टी उभारण्यात यशस्वी झालो. उर्वरित तालुक्यातही शिवसृष्टी उभारण्याचे काम दोन वर्षात केले जाईल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शांने पावन झालेल्या जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे संशोधन केंद्र तयार होत आहे. याचा उपयोग देशातील आणि परदेशातील शिवप्रेमींना होणार आहे. देशातला पहिला थ्रिडी मल्टीमीडिया शो महिनाभरात लोकार्पण करत आहोत.

 

200 कोटी रुपये खर्चून रत्नागिरीत झालेल्या टाटा कौशल्यवर्धन केंद्रातून 5 हजार विद्यार्थी पुढे येणार आहेत. कोट्यवधी रुपयांचा विमा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळाला आहे. रत्नागिरी शहरातील नवीन प्रशासकीय इमारत, जिल्हा परिषदेची इमारत असेल, पोलीस अधीक्षकांचे कार्यालय असेल या सर्व इमारती 800 कोटी रुपये खर्चून सुसज्ज होत आहेत. 24 कोटी रुपये मधून निर्माण होणाऱ्या क्रीटीकल केअर युनिटचे भूमिपूजन आज होणार आहे. प्रादेशिक मनोरुग्णालयाची इंग्रजकालीन वास्तू डागडुजी करण्यासाठी 14 कोटी मंजूर करण्यात आले आहेत. त्याचे काम सुरु आहे. प्रादेशिक मनोरुग्णालय हे कुठेही जाणार नाही, जिल्ह्यातच राहणार आहे, अशी खात्रीही पालकमंत्र्यांनी दिली. भविष्यामध्ये सैनिकांच्या हातातील बंदुकांचा कारखाना हा आपल्या रत्नागिरीमध्ये आणण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करतोय, त्यासाठी दावोस 16 हजार 500 कोटींचा सामंजस्य करार धिरुभाई अंबानी डिफेन्स क्लस्टरबरोबर झाला आहे. हा आपणा सर्वांचा अभिमान व स्वाभिमान आहे, असे सांगून पालकमंत्री म्हणाले, थिबा राजाने ज्या ठिकाणी भगवान गौतम बुध्दांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली होती, त्याठिकाणी साडेआठ कोटी खर्चून बौध्द विहाराची वास्तूचे काम सुरु करण्यात आले आहे. देशातील पहिले सागरी विद्यापीठ रत्नागिरीत होत आहे, त्याची सुरुवात वर्षभरात करायची आहे. पुस्तकांचे गाव मालगुंडला केले जाईल, त्यासाठी सव्वा कोटी रुपये मराठी विभागाकडून दिले जातील. भविष्यातही देशाची, झेंडाची शान अशीच कायम ठेवावी, त्यासाठी देशभक्तीपर कार्यक्रम प्रशासनाकडून राबविले जावेत, असेही पालकमंत्री म्हणाले.

Team Ratnagiri Vartahar
Author: Team Ratnagiri Vartahar

Official Ratnagiri vartahar Media creators & RV News YouTube Channel.

Leave a Comment

आणखी वाचा...