जिल्हास्तरीय लोकशाही दिन
प्रलंबित तक्रारी लवकरात लवकर निकाली काढा – राहुल गायकवाड…
रत्नागिरी: शासनाच्या 100 दिवस नियोजन आराखडा अंतर्गत लोकशाही दिनात दाखल झालेल्या तक्रारी लवकरात लवकर निकाली काढाव्यात, असे निर्देश उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज जिल्हास्तरीय लोकशाही दिन आयोजित करण्यात आला. या बैठकीस जिल्हा पुनर्वसन अधिकारी मारुती बोरकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई, जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे आदी विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. तसेच क्षेत्रीय विभागांचे अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.
बैठकीदरम्यान श्री. गायकवाड यांनी नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या आणि संबंधित विभागप्रमुखांना आठवडाभरात प्रलंबित अर्ज निकाली काढण्याच्या सूचना दिल्या. ते म्हणाले की, “आपले सरकार” पोर्टलवरील तक्रारींचा संबंधित विभागाने वेळोवेळी आढावा घ्यावा आणि त्यावर तत्काळ कार्यवाही करावी.
















