कसबा येथे छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारणार – मंत्री नितेश राणे

“हिंदू धर्मावर वाकड्या नजरेने पाहणाऱ्याला जागेवरच उत्तर दिले जाईल” – नितेश राणे
रत्नागिरी: धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनानिमित्त कसबा संगमेश्वर येथे आयोजित हिंदू धर्म रक्षण दिन कार्यक्रमात बोलताना राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी मोठी घोषणा केली. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारण्याचा निर्धार महायुती सरकारने केला असून, संपूर्ण जग या स्मारकासमोर नतमस्तक होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी मंत्री राणे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “हिंदू धर्मावर वाकड्या नजरेने पाहणाऱ्याला जागेवरच उत्तर दिले जाईल. हीच शिकवण संभाजी महाराजांनी आम्हाला दिली आहे.” तसेच छत्रपती संभाजीनगरातील “स्वराज्यातील काळा ठिपका” लवकरच हटवला जाईल, असेही ते म्हणाले.
महायुती सरकारचा दृढ निश्चय
या कार्यक्रमाला आमदार शेखर निकम, आमदार प्रसाद लाड, माजी आमदार प्रमोद जठार, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, शिवसेना जिल्हाध्यक्ष राहुल पंडित तसेच मोठ्या संख्येने शिवशंभू प्रेमी उपस्थित होते.
मंत्री नितेश राणे म्हणाले, “मी येथे मंत्री किंवा आमदार म्हणून नाही, तर हिंदू म्हणून आलो आहे. छत्रपती संभाजी महाराजांनी हिंदू धर्माच्या रक्षणासाठी बलिदान दिले. त्यामुळे त्यांच्या स्मरणार्थ कसबा येथे भव्य स्मारक उभारले जाईल. यासाठी महायुती सरकारने अर्थसंकल्पात तरतूद केली आहे.”
ते पुढे म्हणाले, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हिंदुत्ववादी विचारांचे आहेत. त्यांच्या तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या पाठिंब्याने या स्मारकासाठी सरकार कटिबद्ध आहे. आम्ही सरदेसाई कुटुंबाशी चर्चा करून त्यांना योग्य तो सन्मान देणार आहोत. मात्र, महाराजांचे स्मारक उभारण्याच्या निर्णयावर कोणतीही तडजोड केली जाणार नाही.”
संभाजी महाराजांच्या बलिदानाचे स्मरण
मंत्री राणे यांनी मुघल आक्रमण, हिंदू मंदिरांची तोडफोड, माता-भगिनींवरील अत्याचार यांचा उल्लेख करत संभाजी महाराजांनी हिंदू धर्मासाठी दिलेल्या बलिदानाचे स्मरण केले. ते म्हणाले, “आज काही जण संभाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लिम सैनिक होते असे सांगून चुकीचा इतिहास मांडण्याचा प्रयत्न करत आहेत. पण सत्य हेच आहे की, महाराजांनी हिंदू धर्माचे रक्षण केले. त्यामुळे हिंदू धर्मावर कुणीही वाकड्या नजरेने पाहू नये.”
स्वराज्यातील ‘काळा ठिपका’ हटवणार
नितेश राणे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “छत्रपती संभाजीनगरातील ‘स्वराज्यातील काळा ठिपका’ हा लवकरच हटवला जाईल. महाराष्ट्रात हिंदवी स्वराज्याच्या आठवणी जतन करायच्या आहेत, त्यामुळे विरोध कितीही झाला तरी कठोर निर्णय घेतला जाईल.”
हिंदू धर्मरक्षणाचा निर्धार
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना ते म्हणाले, “आज फक्त भगव्या टोप्या घालून चालणार नाही, तर हिंदू धर्म रक्षणाची शपथ घ्यावी लागेल. आपल्या राजांचे बलिदान व्यर्थ जाऊ नये यासाठी प्रत्येकाने कटिबद्ध राहिले पाहिजे.”
कार्यक्रमाची सांगता उत्साहात
या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्यावर पोवाडा सादर करण्यात आला. चैत्राली सुर्वे या बालिकेने महाराजांच्या गारद सादर केली. कार्यक्रमानंतर मंत्री नितेश राणे आणि उपस्थित मान्यवरांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन केले.















