आनंदाचा शिधा योजना’ अखेर बंद! तिजोरीतील खडखडाटामुळे राज्य सरकारचा निर्णय
मुंबई — राज्यातील गरिबांसाठी सणासुदीच्या दिवसात आधार असणारी ‘आनंदाचा शिधा’ योजना अखेर बंद करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. राज्य सरकारने निवडणुकीच्या आधी काही महत्त्वाच्या योजना लागू केल्या होत्या. त्यात आनंदाचा शिधा या योजनेचाही समावेश होता.
या योजनेचा फायदा राज्यातील जवळपास १ कोटी ६३ लाख लाभार्थींना झाला होता. त्यानंतर आता ही योजना बंद करण्याचा निर्णय झाल्याची माहिती आहे.
आनंदाचा शिधाच्या माध्यमातून रेशनकार्डधारकांना एक किलो रवा, एक किलो साखर, एक किलो चना डाळ आणि एक लिटर पामतेल मिळत होते. या योजनेच्या माध्यमातून दसरा, दिवाळी, गुढीपाडवा, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती अशा सणांच्या निमित्ताने फक्त १०० रुपयांमध्ये वरील पाच वस्तू दिल्या जात होत्या. मात्र, आता ही योजना बंद करण्यात आली आहे.
या योजनेसाठी गेल्या वर्षी 602 कोटी रुपये खर्च आला होता. मात्र आता गुढीपाडव्याच्या तोंडावर या योजनेचा लाभ नागरिकांना मिळणार नाही.
कारण यंदाच्या अर्थसंकल्पात या योजनेला कोणताही निधी देण्यात आला नाही. दरम्यान, काल (सोमवारी) सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात अनेक योजनांना निधीचे वाटप करण्यात आले. परंतु, त्यामध्ये आनंदाचा शिधा आणि इतर काही योजनांच्या निधीबाबत कुठेही भाष्य करण्यात आलेले नव्हते.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना ‘आनंदाचा शिधा’ ही योजना लागू करण्यात आली होती. मात्र, आता ही योजना बंद करण्यात आल्याचे सांगितले जाते.
आनंदाचा शिधा योजना बंद होण्यामागे निश्चित असं ठोस कारण सांगितले जात नाही. तरीही राज्यात लाडकी बहीण योजनेचा फटका या योजनेला बसला असल्याची चर्चा आहे. लाडकी बहीण योजनेला देण्यात आलेल्या निधीमुळे राज्याच्या तिजोरीमध्ये खडखडाट असून पुढेही अनेक योजनांना ब्रेक लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
आनंदाचा शिधा ही योजना राज्याच्या अन्न आणि नागरी पुरवठा विभागाकडून सुरू करण्यात आली होती. त्यासंदर्भात अनेक तक्रारी आल्या होत्या. मात्र आता ही योजनाच बंद करण्यात आली आहे.

Author: Team Ratnagiri Vartahar
Official Ratnagiri vartahar Media creators & RV News YouTube Channel.