कारखान्यांची धुराडी पेटली, पण दराचं काय? ~ अतुल नाना मानेपाटील संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघ

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

कारखान्यांची धुराडी पेटली, पण दराचं काय?

~ अतुल नाना मानेपाटील

संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघ

 

अहिल्यानगर, जिल्हा प्रतिनिधी – नंदकुमार बगाडे पाटील

राज्यातील साखर कारखाने सुरु होऊन जवळपास महिनाभर झाला असतानाही सोलापूर जिल्ह्यातील बहुतेक साखर कारखानदारांनी अद्याप उसाचा दर जाहीर केलेला नाही. कारखान्यांच्या धुराड्या धगधगत आहेत, उसाला कोयते चालले आहेत; पण शेतकऱ्याच्या मेहनतीचा दर मात्र अजूनही हवेतच आहे.

 

सोलापूर जिल्ह्यात तब्बल ३९ साखर कारखाने आहेत. यापैकी प्रा. शिवाजीराव सावंत सरांचा राजवी अॅग्रो शुगर कारखाना हा अपवाद ठरला असून त्यांनी उसाचा दर ३००१ रुपये प्रति टन जाहीर केला आहे. मात्र उर्वरित एकाही कारखान्याने दर जाहीर करण्याचा धाडस केलेले नाही. दराबाबत शेतकऱ्यांकडून ३५०० रुपयांची मागणी होत असताना कारखान्यांनी मात्र हातावर हात ठेवून गप्पी साधली आहे.

 

दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी आधीच अतिवृष्टी आणि पुरामुळे गंभीर संकटात सापडले आहेत. कुणाची पिके वाहून गेली, कुणाची जमीनच नुसती उध्वस्त झाली. जे थोडेफार पिक उरले आहे त्यातही शंभर अडचणी. अशा वेळी दर न जाहीर करता कारखान्यांनी गळीत हंगाम सुरू केल्याने शेतकऱ्यांच्या उसाला कोयते तर चालले, पण मनात मात्र दराबाबत काळोखच आहे.

 

याउलट कोल्हापूर, सातारा, सांगली या भागातील साखर कारखानदारांनी उसाचे दर जाहीर केले आहेत. या जिल्ह्यांतील साखर कारखान्यांनी ३५०० ते ३६०० रुपये इतके दर ठरवले आहेत. मग सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांना दर जाहीर करण्यात नेमकी अडचण काय, असा प्रश्न शेतकऱ्यांतून विचारला जात आहे.

 

या संदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांना विचारणा झाली असता त्यांनी स्पष्ट सांगितले की,

 

> “कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील शेतकरी उसाच्या दरासाठी एकजुटीने उभे राहतात. त्यामुळे तेथील कारखानदारांना नमतं घ्यावंच लागतं. पण सोलापूर जिल्ह्यातील उस उत्पादक शेतकऱ्यांची अशी एकजूट नाही. म्हणूनच तेथील कारखानदार चांगला दर देत नाहीत, याचा फटका थेट शेतकऱ्यांनाच बसतो.”

खरं तर साखर कारखाने ही शेतकऱ्यांची नव्हे तर कारखानदारांची “सोन्याचं अंड देणारी कोंबडी” मानली जाते. कारण, कारखान्यातून केवळ साखरच विकली जात नाही, तर

वीज निर्मिती,इथेनॉल,मोलॅसिस,मळी,भुसा

अशी अनेक उत्पादने विक्रीला जातात आणि त्यातून प्रचंड महसूल कारखानदारांच्या हाती जमा होतो. मग असे असताना सोलापूर जिल्ह्यातील कारखानदारांना कोल्हापूर–सांगलीप्रमाणे दर देण्यास नेमकी अडचण काय, असा सवाल निर्माण होतो.

पश्चिम महाराष्ट्रात ऊस हेच महत्वाचं पीक. ऊस शेतीवर हजारो कुटुंबांचा प्रपंच उभा आहे. या वर्षी सोलापूर जिल्ह्यातील ऊस अतिवृष्टी आणि पुरामुळे आधीच उद्ध्वस्त झाला. एका बाजूला आस्मानी संकट, आणि दुसऱ्या बाजूला दर न जाहीर केल्याने सुलतानी संकट – अशा कात्रीत शेतकरी सापडला आहे. कारखानदार मात्र शांतपणे धुराड्या पेटवून शेतकऱ्यांची “मजा” बघतायत, अशी भावना ऊस उत्पादकांत तीव्र होत आहे.

 

अशा परिस्थितीत आता ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी एकजूट दाखवण्याची वेळ आल्याचे मत व्यक्त होत आहे.

कारखानदारांना जाब विचारणे,

आपल्या हक्काचा योग्य दर मागणे,

आणि राजकारण बाजूला ठेवून एकत्र उभे राहणे,

यातूनच शेतकऱ्यांच्या पदरात चार पैसे पडू शकतील; अन्यथा कारखानदार कमी दरात शेतकऱ्यांना गुंडाळतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे. पडद्यामागे बहुतांश कारखानदार एकाच सूत्रावर चालतात आणि “ठरलेल्या रेषेपलीकडे दर वाढवायचा नाही” असा मौन करार करूनच कारखाने सुरू केले जातात, असा आरोपही होत आहे.

कारखान्यांची धुराडी पेटली, पण उसाच्या दराचे काय? हा सवाल विचारत ऊस उत्पादकांनी एकजूट होऊन लढा उभारण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

 

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]