स्त्री मुक्ती परिषदेचा ‘ठराव जाहीरनामा’ प्रसारित

स्त्री मुक्ती परिषदेचा ‘ठराव जाहीरनामा’ प्रसारित

 

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : स्त्री मुक्ती परिषदेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या तीन दिवसीय राज्यस्तरीय परिषदेचा समारोप आज मोठ्या उत्साहात यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पार पडला. या समारोपप्रसंगी स्त्री मुक्ती परिषदेचा सविस्तर ‘ठराव जाहीरनामा’ जाहीर करण्यात आला. या वेळी महाराष्ट्र स्त्री मुक्ती परिषदेच्या अध्यक्ष शारदा साठे, डॉ. छाया दातार, डॉ. प्रज्ञा दया पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

 

या ठरावात महिला आयोगाची निष्क्रियता, जेन्डर बजेटची प्रभावी अंमलबजावणी, मनरेगामधील बदललेल्या कायद्याला विरोध आणि मनरेगाचा हक्क सोडणार नाही, हा ठाम निर्धार व्यक्त करण्यात आला. मुस्लिम महिलांचे प्रश्न, कामगारांचे प्रश्न, देशातील वाढता सांप्रदायिक हिंसाचार आणि सांप्रदायिक राजकीय वातावरणाचा मुकाबला करण्याची जबाबदारी, तसेच “मनुस्मृती नको, संविधान हवे” ही स्पष्ट भूमिका ठरावातून मांडण्यात आली.

 

यासोबतच कौटुंबिक हिंसाचार, जातआधारित हिंसा व छळवणूक, क्वीअरट्रान्स लोकांचे प्रश्न, अपंग महिलांचे प्रश्न, महिलांना त्यांच्या गरजांनुसार आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे, लैंगिक सेवा पुरविणाऱ्या लैंगिक श्रमिकांचे हक्क, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, नैसर्गिक संसाधनांवरील महिलांचा अधिकार, कचरावेचकांचे प्रश्न व कचरा व्यवस्थापन, तसेच प्रसार माध्यमे आणि समाज माध्यमांची भूमिका या मुद्द्यांवर सविस्तर भूमिका मांडण्यात आली. शालेय आणि विद्यापीठीय अभ्यासक्रमातून स्त्री चळवळीचा इतिहास व विचारांचा समावेश करावा, तसेच सांस्कृतिक जीवनात स्त्रियांच्या योगदानाची ओळख अधिक ठळकपणे निर्माण करावी, यावरही ठरावात भर देण्यात आला.

 

परिषदेच्या समारोपानिमित्त मुंबईतील आझाद मैदानात भव्य सांस्कृतिक मेळावा आयोजित करण्यात आला होता. राज्याच्या विविध भागांतून आलेल्या महिला प्रतिनिधींनी कविता सादर केल्या, गाणी म्हटली आणि आपल्या अनुभवांना शब्द दिले. आदिवासी, मुस्लिम, कष्टकरी महिलांसह विविध समुदायांतील महिलांना मंचावर येऊन आपल्या विभागातील समस्या मांडण्याची संधी देण्यात आली.

 

या वेळी एका महिलेने महत्त्वपूर्ण प्रस्ताव मांडला. आजही अनेक गावांमध्ये चावडीवर स्त्रियांना प्रवेश नाकारला जातो. या पार्श्वभूमीवर गावातील महिला आणि LGBTQ+ समुदायातील प्रतिनिधींना एकत्र घेऊन ‘चावडी सावित्री फातिमाची’ हा उपक्रम राबवावा, असा प्रस्ताव मांडण्यात आला. या उपक्रमांतर्गत चावडीवर किर्तन, भारूड, व्याख्यान किंवा चर्चा आयोजित करून सामाजिक बदलाचा संदेश देण्याची संकल्पना मांडण्यात आली असून, या उपक्रमाची सुरुवात येत्या ३ जानेवारीपासून करण्याचे आवाहन करण्यात आले. ही सुरुवात सावित्रीबाई फुले यांना दिलेली मानवंदना ठरेल, असे मत व्यक्त करण्यात आले.

 

‘मिळून साऱ्या जणी’ या मासिकाच्या प्रतिनिधींनी आपले मत व्यक्त करताना सांगितले की, समता प्रस्थापित करायची असेल तर ममता आवश्यक आहे. स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव या मूल्यांवर आधारित व्यवस्था निर्माण करणे हेच स्त्री चळवळीचे अंतिम ध्येय असल्याचे त्यांनी नमूद केले.

 

स्त्री मुक्ती चळवळीचे प्रतिनिधी सुरज पवार यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, गेल्या ५० वर्षांत स्त्री मुक्ती चळवळीने महत्त्वाचे कार्य केले आहे आणि पुढेही हे कार्य सुरू राहील. मात्र, खरी गरज पुरुषांना समानतेची भाषा समजावून सांगण्याची आहे. ही भाषा घराघरातून पोहोचली पाहिजे. स्त्री मुक्ती चळवळ ही पुरुषविरोधी नसून पितृसत्ताक व्यवस्थेविरोधात आहे. पुरुष म्हणजे मर्दागी हा संकुचित विचार खोडून काढणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 

या ठराव जाहीरनाम्यातून स्त्री मुक्ती परिषदेने महिलांचे, कष्टकरी वर्गाचे आणि वंचित समुदायांचे प्रश्न ठामपणे मांडत आगामी काळातील संघर्षाची दिशा स्पष्ट केली असून, सामाजिक न्याय, समता आणि मानवी हक्कांसाठीचा लढा अधिक व्यापक करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें