भारताचा ७ धावांनी ऐतिहासिक विजय; ४९९ धावांचा विक्रम, अंतिम फेरीत न्यूझीलंडशी महासंग्राम

rv ad

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

भारताचा ७ धावांनी ऐतिहासिक विजय; ४९९ धावांचा विक्रम, अंतिम फेरीत न्यूझीलंडशी महासंग्राम

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक २०२६ च्या दुसऱ्या उपांत्य फेरीत भारतीय संघाने इंग्लंडवर ७ धावांनी थरारक विजय नोंदवला. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर रंगलेल्या या सामन्यात धावांचा अक्षरशः महापूर उसळला. दोन्ही संघांनी मिळून तब्बल ४९९ धावा केल्या. टी-२० विश्वचषक इतिहासातील एका सामन्यातील ही सर्वाधिक एकत्रित धावसंख्या ठरली. या दिमाखदार विजयासह भारताने अंतिम फेरीत प्रवेश निश्चित केला. अहमदाबाद येथे रविवार दिनांक ८ मार्च रोजी न्यूझीलंडविरुद्ध विजेतेपदासाठी निर्णायक सामना अहमदाबाद येथे रंगणार आहे.
इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. भारतीय फलंदाजांनी सुरुवातीपासून आक्रमक भूमिका घेत इंग्लंडच्या गोलंदाजांवर दडपण निर्माण केले. पूर्ण २० षटकांत भारताने ७ गडी गमावत २५३ धावांचा भक्कम डोंगर उभा केला. उपांत्य फेरीतील भारताची ही सर्वोच्च धावसंख्या ठरली.
आक्रमक फलंदाजी करत संजू सॅमसनने ४२ चेंडूंमध्ये ८ चौकार आणि ७ षटकारांच्या जोरावर ८९ धावांची धडाकेबाज खेळी साकारली. इशान किशनने १८ चेंडूंमध्ये ३९ धावा करत संघाला वेगवान सुरुवात करून दिली. शिवम दुबेने २५ चेंडूंमध्ये ४३ धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. हार्दिक पांड्याने १२ चेंडूंमध्ये २७ धावा जोडल्या. तिलक वर्माने ७ चेंडूंमध्ये २१ धावांची झंझावाती खेळी करत डावाला शेवटच्या टप्प्यात वेग दिला.
२५४ धावांच्या प्रचंड लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडने झुंजार लढत दिली. इंग्लंडच्या डावात जेकब बेथेलने ४८ चेंडूंमध्ये ८ चौकार आणि ७ षटकारांच्या जोरावर १०५ धावांची शानदार खेळी साकारली. विल जॅक्सने २० चेंडूंमध्ये ३५ धावांचे योगदान दिले. सॅम करनने १८ धावा जोडत सामना शेवटपर्यंत रंगतदार ठेवला. निर्धारित २० षटकांत इंग्लंडचा डाव ७ बाद २४६ धावांवर थांबला. भारताने ७ धावांनी रोमांचक विजय मिळवला.
निर्णायक टप्प्यावर भारतीय गोलंदाजांनी अचूक मारा करत सामना भारताच्या बाजूने झुकवला. जसप्रीत बुमराहने सोळावे आणि अठरावे षटक अत्यंत प्रभावी टाकले. त्या दोन षटकांत त्याने केवळ १४ धावा दिल्या. हार्दिक पांड्याने एकोणिसाव्या षटकात सॅम करनचा महत्त्वाचा बळी घेत निर्णायक भागीदारी मोडली. अक्षर पटेलने क्षेत्ररक्षणात दोन अप्रतिम झेल घेत संघाला मोलाची साथ दिली.
संपूर्ण सामन्यात चौकार आणि षटकारांचा अक्षरशः पाऊस पडला. दोन्ही संघांच्या फलंदाजांनी मिळून ३४ षटकार आणि ३९ चौकारांची नोंद केली. टी-२० विश्वचषकाच्या इतिहासातील एका सामन्यातील ही सर्वाधिक एकत्रित धावसंख्या ठरली. उपांत्य फेरीतील भारताची २५३ धावसंख्या ही नवीन विक्रमी कामगिरी ठरली. बाद फेरीतील सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्या म्हणून जेकब बेथेलच्या १०५ धावांची नोंद झाली.
आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये एका सामन्यातील सर्वाधिक एकत्रित धावसंख्येचा विक्रम २०१८ मध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यात नोंदवला गेला होता. त्या सामन्यात दोन्ही संघांनी मिळून ५१७ धावा केल्या होत्या. वानखेडेवरील या सामन्यातील ४९९ धावा त्या विक्रमाच्या अत्यंत जवळ पोहोचल्या.
सामनावीर पुरस्कार संजू सॅमसनला प्रदान करण्यात आला. कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी संघाच्या एकत्रित कामगिरीचे कौतुक केले. इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रुक याने संजू सॅमसनचा झेल सुटणे हा सामन्याचा निर्णायक क्षण ठरल्याची कबुली दिली.
या थरारक विजयामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास अधिक बळकट झाला आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर न्यूझीलंडविरुद्ध रंगणाऱ्या अंतिम सामन्याकडे आता संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले आहे. विजेतेपद कायम राखण्याच्या निर्धाराने भारतीय संघ अंतिम लढतीसाठी सज्ज झाला आहे.

RV. Reporters
Author: RV. Reporters

Guhagar Office .. * Ratnagiri vartahar Digital News * ..

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]