सिंधुदुर्गातील आंबा-काजू शेतकऱ्यांना तात्काळ भरघोस नुकसानभरपाई द्या; माजी आमदार वैभव नाईक यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी

सिंधुदुर्गातील आंबा-काजू शेतकऱ्यांना तात्काळ भरघोस नुकसानभरपाई द्या; माजी आमदार वैभव नाईक यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी

मोहर जळाल्याने ८० ते ९० टक्के नुकसान; मदत व पुनर्वसन विभागाला कार्यवाहीचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश


मुंबई : प्रतिनिधी

हवामानातील बदलामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा व काजू पिकांचा मोहर जळून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दोन्ही पिकांचे तब्बल ८० ते ९० टक्के नुकसान झाल्याने बागायतदार गंभीर आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे नुकसानग्रस्त आंबा व काजू शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या वतीने तात्काळ व भरघोस नुकसानभरपाई जाहीर करावी, अशी मागणी कुडाळ-मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईतील मंत्रालयात भेट घेऊन केली.

या मागणीवर सकारात्मक प्रतिसाद देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मदत व पुनर्वसन विभागाला तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिल्याची माहिती मिळाली आहे.

माजी आमदार वैभव नाईक यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा व काजू बागायतदार तसेच संबंधित व्यापारी वर्ग सध्या अत्यंत गंभीर आर्थिक संकटांचा सामना करत आहेत. हवामानातील प्रतिकूल परिस्थिती, कीड-रोगांचा प्रादुर्भाव, वाढलेला उत्पादन खर्च तसेच बाजारातील दरातील मोठी घसरण आणि अनिश्चितता यामुळे शेतकरी व व्यापारी दोघेही अडचणीत आले आहेत.

त्यामुळे राज्य सरकारने तातडीने हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज असल्याचे वैभव नाईक यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले.

निवेदनामध्ये आंबा व काजू बागायतदारांच्या काही महत्त्वाच्या मागण्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये बाधित शेतकऱ्यांना तात्काळ आणि भरघोस नुकसानभरपाई जाहीर करणे, आंबा व काजू पिकांसाठी घेतलेली सर्व कर्जे गोठवून त्यांचा कर्जमाफी योजनेत स्पष्ट समावेश करणे, औषधे व खतांच्या दरांवर नियंत्रण ठेवून बनावट कंपन्यांवर कठोर कारवाई करणे, तसेच उसाप्रमाणे आंबा व काजू पिकांसाठी जास्तीत जास्त हमीभाव निश्चित करणे या मागण्यांचा समावेश आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हजारो बागायतदारांचे अर्थकारण आंबा आणि काजू पिकांवर अवलंबून असल्याने शासनाने तातडीने निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें