अशोक खरात प्रकरणात खळबळजनक आरोप; रूपाली चाकणकर महिलांना भोंदूकडे नेत असल्याचा दावा

highlight

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

अशोक खरात प्रकरणात खळबळजनक आरोप; रूपाली चाकणकर महिलांना भोंदूकडे नेत असल्याचा दावा

📌 माजी सदस्य आशा मिरगे यांचा गौप्यस्फोट; राजकीय नेते व अधिकाऱ्यांवरही गंभीर आरोप

🗞️ सविस्तर बातमी

मुंबई / प्रतिनिधी : अंधश्रद्धेच्या नावाखाली महिलांचे कथित शोषण करणाऱ्या भोंदू अशोक खरात प्रकरणात नवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्या आशा मिरगे यांनी गंभीर आरोप करत मोठा गौप्यस्फोट केला आहे.

आशा मिरगे यांच्या दाव्यानुसार, राष्ट्रवादीच्या नेत्या व राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर या अनेक महिलांना अशोक खरातकडे घेऊन जात असत. या आरोपामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना मिरगे यांनी सांगितले की, महिला संघटनांच्या बैठकींमध्ये अशोक खरातला बोलावले जात असे आणि त्या बैठकीत चाकणकर त्याची प्रशंसा करत असत. “मी आज जिथे आहे, ते यांच्यामुळेच,” असे वक्तव्य चाकणकर करत असल्याने अनेक भोळ्या महिलांचा त्याच्यावर विश्वास बसत होता, असा दावा त्यांनी केला.

मिरगे यांनी पुढे सांगितले की, “कुंपणच शेण खाते” ही म्हण येथे खरी ठरली आहे. महिलांच्या संरक्षणासाठी असलेल्या व्यवस्थेनेच महिलांना संकटात ढकलल्याचा आरोप त्यांनी केला.

दरम्यान, या प्रकरणात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. अशोक खरातच्या कार्यालयात काम करणाऱ्या नितीन जाधव या कर्मचाऱ्याने कार्यालयात गुप्त कॅमेरे बसवून अनेक व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचा दावा मिरगे यांनी केला. त्यानंतर काही व्हिडिओंच्या आधारे पैशांची मागणी केल्याचेही त्यांनी सांगितले.

या प्रकरणात संबंधित पीडित महिलेच्या कुटुंबीयांनी पुढाकार घेत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलीस तपासात हे व्हिडिओ खरे असल्याचे उघड झाले असून, आरोपीकडे अनेक व्हिडिओ असल्याची माहिती समोर आली आहे.

याशिवाय, मिरगे यांनी आणखी गंभीर आरोप करत काही राजकीय नेते आणि वरिष्ठ अधिकारी अशोक खरातच्या संपर्कात असल्याचे सांगितले. यामध्ये दीपक केसरकर यांचे नावही त्यांनी घेतले आहे.

महिला आयोगाबाबत बोलताना मिरगे म्हणाल्या की, पूर्वी आयोगाबद्दल महिलांमध्ये विश्वास होता. मात्र, चाकणकर यांच्या कार्यपद्धतीमुळे तो विश्वास कमी झाला. त्यांचा वावर, ग्लॅमर आणि राजकीय शैली यामुळे सामान्य महिलांना त्या जवळच्या वाटत नव्हत्या, असा आरोप त्यांनी केला.

या सर्व आरोपांमुळे अशोक खरात प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे बनले असून, यामध्ये नेमके सत्य काय आहे हे पोलीस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. सध्या या प्रकरणाने राज्यातील राजकारण आणि सामाजिक क्षेत्रात मोठी खळबळ उडवली आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]