पहिला ‘पंडित खावर’ पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक इक्बाल मुकादम यांना प्रदान

highlits

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

पहिला ‘पंडित खावर’ पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक इक्बाल मुकादम यांना प्रदान

 

दापोलीतील ‘जागरण’ संस्थेचा साहित्य क्षेत्रातील मानाचा पहिला सन्मान; ‘रंगधारा’ कविसंमेलनाने रंगली साहित्य मैफल

नवीमुंबई (मंगेश जाधव) : साहित्य, संस्कृती आणि सामाजिक जाणिवांचा सुंदर संगम घडवणारे ज्येष्ठ साहित्यिक इक्बाल मुकादम यांना प्रतिष्ठेचा पहिला ‘पंडित खावर’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. साहित्य क्षेत्रात अनेक दशकांपासून सुरू असलेल्या त्यांच्या अभ्यासपूर्ण, संवेदनशील आणि समाजाभिमुख लेखनाचा गौरव म्हणून हा पुरस्कार देण्यात आला असून साहित्यविश्वात या सन्मानाचे विशेष स्वागत होत आहे.

 

दापोली येथील ‘जागरण’ सामाजिक संस्थेने यावर्षीपासून साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी ‘पंडित खावर’ पुरस्कार सुरू केला आहे. शहरातील पद्मसाई सभागृहात झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यास तालुक्यातील साहित्यप्रेमी, रसिक वाचक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

दापोली अर्बन बँकेचे चेअरमन डॉ. जयवंत जालगांवकर यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्या हस्ते ज्येष्ठ साहित्यिक इक्बाल मुकादम यांना पहिला ‘पंडित खावर’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.

 

समाजातील सामान्य माणसाच्या भावविश्वाला शब्दबद्ध करताना मानवी मूल्यांची जपणूक करणारे लेखन ही इक्बाल मुकादम यांच्या साहित्याची खरी ओळख मानली जाते. त्यांच्या लेखणीतून ग्रामीण जीवन, सामाजिक व्यवस्था, माणसांमधील नात्यांची ऊब आणि बदलत्या काळातील वास्तव प्रभावीपणे मांडले गेले आहे. त्यामुळेच वाचकांच्या मनात त्यांनी स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे.

 

‘पंडित खावर’ या नावाने दिला जाणारा हा पहिलाच पुरस्कार असल्याने या सन्मानाला विशेष ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. साहित्य हे केवळ मनोरंजनाचे माध्यम नसून समाजप्रबोधनाचे प्रभावी साधन आहे, ही भूमिका जपणाऱ्या साहित्यिकांचा गौरव करण्याच्या उद्देशाने हा पुरस्कार सुरू करण्यात आल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

 

पुरस्कार स्वीकारताना इक्बाल मुकादम यांनी आपल्या साहित्यिक प्रवासातील आठवणींना उजाळा देत, “लेखन ही केवळ अभिव्यक्ती नसून समाजाशी प्रामाणिक राहण्याची जबाबदारी आहे,” असे मनोगत व्यक्त केले. त्यांच्या या विचारांनी उपस्थित साहित्यप्रेमी भारावून गेले.

 

यावेळी जागरण सामाजिक सेवा संस्थेचे अध्यक्ष मंगेश मोरे, प्राचार्य डॉ. अशोक निर्बाण, पत्रकार मुश्ताक खान, जालगावचे सरपंच अक्षय फाटक, नगरसेविका सौ. रिया सावंत, माजी नगरसेवक सचिन गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद पांगारकर आदी मान्यवर उपस्थित होते.

 

या पुरस्कार वितरण सोहळ्याचे औचित्य साधून दापोलीतील नामवंत कवींच्या सहभागातून ‘रंगधारा’ कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये कवी कैलास गांधी, सुदेश मालवणकर, सुनील कदम, सचिन चव्हाण, रेखा जगलकर आणि सुशांत रिसबूड यांनी आपल्या कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

 

कार्यक्रमाला साहित्यिक, कवी, अभ्यासक, सामाजिक कार्यकर्ते आणि रसिकांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]