जीवनाचा उत्कर्ष करण्याची ताकद योगविद्येमध्येच – डॉ. स्वामी परमार्थदेव
उपनिषदातील योगविद्या विषयक व्याख्यानात विचार मांडले; भारताची ऋषी आणि कृषीप्रधान संस्कृती जगासाठी आदर्श
तळवली (मंगेश जाधव) – “योग ही भारताला परंपरेने मिळालेली जीवनदृष्टी आहे. जीवनाचा उत्कर्ष साधायचा असेल, तर उपनिषदांमधील योगविद्येचा अभ्यास आणि आचरण महत्त्वाचे ठरते,” असे प्रतिपादन पतंजली योगपीठाचे मुख्य केंद्रीय प्रभारी डॉ. स्वामी परमार्थदेव यांनी केले. कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन उपकेंद्र आणि पतंजली परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने ‘उपनिषदातील योगविद्या’ या विषयावर तळवली येथे आयोजित व्याख्यानात ते बोलत होते.
डॉ. परमार्थदेव यांनी सांगितले की, “भारत हा ऋषी आणि कृषीप्रधान देश असून योगविद्या ही आपल्या वैदिक परंपरेचा आत्मा आहे. वेद-उपनिषदांपासून आधुनिक जीवनशैलीपर्यंत योगाचा प्रवास हा अत्यंत समृद्ध आहे. योग म्हणजे अनुशासन, संतुलन आणि व्यवस्था. जेथे योग नाही, तेथे रोग निश्चितच असतो.”
ईशावास्य आणि कठोपनिषदांतील योगविषयक उल्लेख करत त्यांनी कर्मयोग, ज्ञानयोग आणि उपनिषदांतील शिकवणीवर सखोल भाष्य केले. “जी विद्या गुरूच्या सान्निध्यात श्रद्धेने ग्रहण केली जाते, ती म्हणजेच उपनिषद,” असे ते म्हणाले. त्यांनी भक्तिपूर्वक जीवन जगण्याच्या महत्त्वावरही भर दिला.
या कार्यक्रमाला संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. हरेराम त्रिपाठी यांची प्रेरणा लाभली. तसेच पतंजली रत्नागिरी परिवाराच्या संयुक्त सहकार्याने कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाला भारत स्वाभिमान ट्रस्टचे राज्य प्रभारी बापूजी पाडळकर, पतंजली योग समिती पश्चिम महाराष्ट्राचे चंद्रशेखर खापणे, पतंजली किसान सेवा समितीचे राज्य प्रभारी उदय वाणी, सोशल मीडिया प्रभारी आचार्य अविनाश, युवा भारतचे प्रीतेश लाड, जिल्हा प्रभारी मारुती अळकुटे, अॅड. विद्यानंद जोग, डॉ. कल्पना आठल्ये, प्रा. अविनाश चव्हाण, प्रा. अक्षय माळी, सौ. रमाताई जोग आदी उपस्थित होते. डॉ. परमार्थदेव यांचा सत्कार डॉ. दिनकर मराठे यांच्या हस्ते मानपत्र देऊन करण्यात आला.
–
#योगविद्या #उपनिषद #पतंजलीयोगपीठ #स्वामीपरमार्थदेव #संस्कृतविद्यापीठ #योगप्रवचन #रत्नागिरीयोग #तळवली #भारतीयसंस्कृती #योगफॉरलाईफ















