रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील इसवली गावाकडे जाणाऱ्या रस्त्याची पहिल्याच पावसात अक्षरशः चाळण झाली आहे.
जिल्हा परिषदेच्या बांधकाम उपविभाग, लांजा यांच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
रत्नागिरी – (लांजा -जितेंद्र चव्हाण ) जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील इसवली गावाकडे जाणाऱ्या रस्त्याची पहिल्याच पावसात अक्षरशः चाळण झाली आहे. अवघ्या तीन ते चार महिन्यांपूर्वीच पूर्ण झालेल्या या रस्त्यावर मोठे खड्डे पडल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या घटनेमुळे संबंधित ठेकेदार आणि जिल्हा परिषदेच्या बांधकाम उपविभाग, लांजा यांच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
काम निकृष्ट की दुर्लक्ष? जनतेचा सवाल
इसवली येथील सामाजिक कार्यकर्ते, उमेश कदम यांनी या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “अवघ्या तीन ते चार महिन्यांतच रस्त्याची अशी दुर्दशा होत असेल, तर याला जबाबदार कोण? ठेकेदार की बांधकाम विभाग?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. संबंधित विभागाच्या अभियंत्यांनी कामाचे ऑडिट कसे केले आणि कोणत्या निकषांवर हे काम पास केले, हा प्रश्नही ग्रामस्थांना सतावत आहे.
रस्त्याची दुरवस्था आणि प्रवाशांची गैरसोय
लांजा तालुक्यातील इसवली मठाचा पऱ्या – कोंडवाडी, खांबेरीवाडी – सतीचा उंबर या मार्गावर झालेल्या या रस्त्याची दुरावस्था समोर आली आहे. या मार्गावरून दररोज एसटीच्या सहा ते सात फेऱ्या होतात. त्यामुळे शाळेतील विद्यार्थी, नोकरदार आणि सामान्य नागरिकांना दररोज मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. खड्ड्यांमुळे अपघातांचा धोकाही वाढला आहे.![]()
चौकशीची मागणी आणि कारवाईची अपेक्षा
ग्रामस्थांनी, विशेषतः सामाजिक कार्यकर्ते उमेश कदम यांनी, या निकृष्ट कामाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. संबंधित ठेकेदारावर कठोर कारवाई करावी आणि जिल्हा परिषदेने या गंभीर बाबीकडे गांभीर्याने लक्ष देऊन लवकरात लवकर रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अन्यथा, पावसाळ्यात ही समस्या अधिक गंभीर रूप धारण करेल, अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
VDO पाहण्यासाठी येथे क्लिक करा
रत्नागिरी #लांजा #इसवली #रस्त्याचीदुर्दशा #पहिलापाऊस #खड्डे #निकृष्टकाम #ग्रामस्थसंतापले #जिल्हापरिषद #ठेकेदार #चौकशीकरा #नागरिकांचीगैरसोय #एसटीसेवा #उमेशकदम #जितेंद्रचव्हाण















