वाटद MIDC विरोधात कोकणातून संतापाचा भडका – अस्तित्वाच्या लढ्यासाठी मुंबईत रणशिंग
मुंबई प्रतिनिधी | निलेश रहाटे
रत्नागिरी जिल्ह्यातील वाटद, मिरवणे, कळझोंडी, गडनरळ, वैद्यलावगण, कोळीसरे आदी निसर्गसमृद्ध गावांवर प्रस्तावित MIDC प्रकल्पाचे संकट अधिकच गडद झाले आहे. या प्रकल्पासाठी होणाऱ्या जमीन अधिग्रहणाच्या हालचालींना स्थानिक ग्रामस्थांचा तीव्र विरोध असून, या विरोधाची धग आता मुंबईपर्यंत पोहोचली आहे.
या गावांतील शेतकरी, जमिनीचे मूळ मालक आणि सामान्य ग्रामस्थांनी आता हा लढा केवळ जमिनीचा नसून, गाव, संस्कृती आणि अस्तित्वाच्या रक्षणाचा लढा असल्याचे स्पष्ट केले आहे. प्रकल्पविरोधात एकत्र आलेल्या स्थानिकांनी निर्णायक भूमिका घेत मुंबईमध्ये या लढ्याची रणनिती आखण्यासाठी ३ ऑगस्ट रोजी दादर येथील पर्ल सेंटर येथे आढावा बैठक आयोजित करण्यात आली.
बैठकीला संघर्ष कृती समितीचे प्रमुख प्रथमेश गोपाळ गावणकर, उपाध्यक्ष संतोष बारगुडे, नंदकिशोर आग्रे, ओमकार शितप यांच्यासह मुंबईस्थित असणारे ग्रामस्थ कोकणवासीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीत पुढील निर्णय घेण्यात आला की, “जोपर्यंत ही अधिसूचना शासन रद्द करत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेण्यात येणार नाही.” असे सर्वानुमते ठरविण्यात आले. आंदोलनाची पुढील दिशा निश्चित करताना, येत्या आठ दिवसांत दादर येथे हजारोंच्या संख्येने निदर्शने करण्यात येणार असून, सुप्रीम कोर्टाचे ज्येष्ठ वकील आणि मानवाधिकार विश्लेषक अॅड. असीम सरोदे यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य जनसंवाद सभा घेतली जाणार आहे.
तसेच, संघर्ष कृती समितीचे शिष्टमंडळ लवकरच मा. उद्धव ठाकरे आणि मा. राज ठाकरे यांची भेट घेऊन स्थानिक भावना आणि मागण्या त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहे. प्रशासनाने आणि शासनाने जर या मागण्यांकडे दुर्लक्ष केले, तर समितीने बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा दिला आहे.
स्थानिक ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी स्पष्ट शब्दांत आपली भूमिका मांडली की,
“विकास हवा, पण आमच्या अटींवर. आमच्या जमिनी बळकावून नव्हे, तर शेतीपूरक किंवा पर्यटनावर आधारित प्रकल्प आणल्यास आम्ही सहकार्य करू, पण जबरदस्तीचा विकास नको.”
*संघर्ष समितीचे प्रमुख प्रथमेश गावणकर यांनी सांगितले की,*
वाटद MIDC प्रकल्पाविरोधातील हा संघर्ष केवळ स्थानिक नसून संपूर्ण कोकणच्या भविष्यासाठी महत्त्वाचा मानला जात आहे. पुढील काही दिवसांत या आंदोलनाला वेग आणि व्यापक स्वरूप प्राप्त होणार हे नकीच.