रत्नागिरी तालुक्यातील जयगड- हातखंबा रस्ता बनलाय मृत्यूचा सापळा
पुढील आठ दिवसात योग्य ती कार्यवाही न केल्यास आंदोलनाचा इशारा – श्री प्रथमेश गोपाळ गावणकर ( अध्यक्ष खंडाळा पंचक्रोशी सामाजिक संस्था)
निलेश रहाटे :- रत्नागिरी प्रतिनिधी
मागील काही महिन्यात जयगड ते हातखंबा या रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले पहायला मिळत आहे.*प्रशासनाच्या चुकीच्या धोरणामुळे सर्वसामान्य जनतेचे हे बळी जात असल्याचा खळबळजनक आरोप जयगड परिसरातील सामाजिक कार्यकर्ते श्री प्रथमेश गावणकर यांनी केला आहे.* साधारणतः 2005 पासून जयगड परिसरात जेएसडब्ल्यू पोर्ट व आंग्रे पोर्ट यांच्या माध्यमातून या रस्त्यावरून माल वाहतूक करणाऱ्या वाहनांची सुरवात झाली.सुरवातीला या दोन्ही पोर्ट ची व्याप्ती कमी प्रमाणात असल्यामुळे फारसा त्रास जाणवत नव्हता मात्र मागील 10 वर्षात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात माल वाहतुकीला सुरुवात झाली. तुलनेने रस्ता जसा आहे तसाच आहे.
रस्त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त ओव्हरलोड वाहतूक,खराब रस्ते व चालकांचा अनियंत्रित वेग यामुळे या रस्त्यावर महिन्यातून किमान एका तरी निष्पाप नागरिकाचा बळी जात आहे.
यावर प्रशासनाकडून मात्र कोणतीही ठोस उपाययोजना केल्याचे दिसण्यात येत नाही.
अगदीच या आठवड्यात हातखंबा मध्ये एक भीषण अपघात झाला यामध्ये 20 वर्षीय तरुणाचा अतिशय दुर्दैवी मृत्यू झाला.अनेक जण त्यामधे जखमी आहेत. या घटनेबाबत स्थानिक नागरिकांन मध्ये प्रचंड असंतोषाचे वातावरण आहे.
या रस्त्यावर अनेक शाळा , महाविद्यालये देखील आहेत त्यामुळे या शाळेत महाविद्यालया मध्ये येणारे पालक देखील चिंतेत आहेत. अनेकदा या रस्त्यावर मालवाहतूक करणाऱ्या बंद पडलेल्या वाहनांमुळे वाहतूक ठप्प असते.एकंदरीत या सर्व कारणांमुळे सर्वसामान्य नागरिकांना या रस्त्यावरून जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे.
या सर्व गोष्टी समोर ठेवून येत्या काही दिवसात या परिसरात स्थानिक नागरिकांच्या रोषातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आज उपविभागीय अधिकारी रत्नागिरी श्री जीवन देसाई साहेब यांचे कार्यालयात प्रत्यक्ष भेट देऊन नायब तहसीलदार सौ श्रुती सावंत मॅडम यांच्याकडे निवेदन देण्यात आले.
पुढील आठ दिवसात योग्य ती कार्यवाही,उपयोजना झाली नाही तर या तालुक्यातील जनता आपल्या जगण्याच्या मूलभूत अधिकारासाठी हजारोंच्या संख्येने रस्तावर उतरेल व जोपर्यंत यावर तोडगा निघत नाही तोपर्यंत या रस्तावर कोणतीही मालवाहतूक होणार नाही.आणि याला जबादार प्रशासनातील संबंधित विभाग असतील.दिवसा ढवळ्या रस्त्यावर कीड्या मुंग्यांसारखे चिरडून मारण्या इतके जीवन स्वस्त नाही.असा निर्वाणीचा इशारा प्रशासनाला आज या निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आला आहे.















