भारताचा रंगतदार सामन्यात 17 धावांनी विजय, दक्षिण आफ्रिकेची कडवी झुंज अपयशी!
पाहुण्या दक्षिण आफ्रिकेने रांचीत टीम इंडिया विरुद्ध 350 धावांचा पाठलाग करताना शेवटच्या ओव्हरपर्यंत जोरदार झुंज दिली. टीम इंडियाने विराट कोहली याच्या शतकाच्या जोरावर 349 धावा केल्या. त्यामुळे टीम इंडिया हा सामना सहज जिंकेल, असा विश्वास चाहत्यांना होता. भारतीय गोलंदाजांनी टॉप ऑर्डरला 11 धावांच्या मोबदल्यात मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. त्यामुळे टीम इंडिया सामना जिंकणारच, असं चित्र होतं. मात्र दक्षिण आफ्रिकेच्या मिडल आणि लोअर ऑर्डरमधील फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांची धुलाई केली. त्यामुळे सामना शेवटच्या ओव्हरपर्यंत गेला. मात्र अखेरच्या ओव्हरमध्ये टीम इंडियाने हा सामना जिंकला.
कॉर्बिन बॉश याने अखेरच्या क्षणी फटकेबाजी केली. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला शेवटच्या ओव्हरमध्ये 18 धावांची गरज होती. मात्र प्रसिध कृष्णा याने कॉर्बिन बॉश याला आऊट केलं. दक्षिण आफ्रिकेचं यासह पॅकअप झालं. भारतीय गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेला 49.2 ओव्हरमध्ये 332 रन्सवर ऑलआऊट केलं. भारताने यासह हा सामना 17 धावांनी जिंकला. भारताने या विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे.















