शिवसेना नेते रामदास भाई कदम यांच्या मातोश्री लीलाबाई कदम यांचे निधन
खेड : शिवसेना नेते तथा माजी मंत्री सन्मा. रामदास भाई कदम यांच्या मातोश्री लीलाबाई गंगाराम कदम (वय शंभर वर्षांपेक्षा अधिक) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचा अंत्यविधी आज मंगळवार, दिनांक ९ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १ वाजता जामगे स्मशानभूमी येथे होणार आहे.
लीलाबाई कदम यांच्या निधनाने खेड तालुक्यासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. शांत, धार्मिक वृत्तीच्या आणि सर्वांना स्नेहाने वागवणाऱ्या लीलाबाई कदम यांनी कदम कुटुंबाला सामाजिक कार्याची प्रेरणा दिली होती.
त्या राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांच्या आजी होत. दीर्घकाळापासून त्या वयोमानानुसार आजारी होत्या आणि आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
मृत्युसमयी त्यांच्या मागे चार मुले, सुना, जावई, नातवंडे, पतवंडे, नात सुना, नात जावई असा मोठा परिवार आहे. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती म्हणून त्यांचे मार्गदर्शन सर्वांसाठी महत्त्वाचे होते.
त्यांच्या निधनानंतर नातेवाईक, ग्रामस्थ, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर जामगे येथे दाखल होत असून, विविध नेतेमंडळींनी सोशल मीडियाद्वारे श्रद्धांजली अर्पण केली आहे. कदम कुटुंबावर मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यापकपणे व्यक्त होत आहे.
# रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमीपत्र















