रत्नागिरीत LCB ची धडक कारवाई — कोकणनगरातून गांजा विक्रेत्यास रंगेहाथ अटक
रत्नागिरी :
जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी यांनी रत्नागिरी जिल्ह्याला अमली पदार्थमुक्त करण्यासाठी दिलेल्या कठोर निर्देशांनुसार, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) रत्नागिरी शहरात मोठी कारवाई केली. कोकणनगर परिसरातून गांजाची विक्री करणाऱ्या एका व्यक्तीस रंगेहाथ अटक करण्यात आली आहे.
दिनांक ०८ डिसेंबर २०२५ रोजी पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली LCB चे पथक रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना, कोकणनगर कब्रस्थानजवळील मोकळ्या जागेत एक इसम हातात कॅरीबॅग घेऊन संशयास्पदरीत्या उभा असल्याचे दिसले.
पथकाला पाहताच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलीसांनी योग्य बळाचा वापर करून दुपारी २.३० वाजता त्याला पकडले. पंचांसमक्ष चौकशी केल्यावर त्याने आपले नाव रईस सईद खान (वय ३२), रा. घर क्र. ३९०, मराठी शाळेसमोर, कोकणनगर, रत्नागिरी असे सांगितले.
पंचनामा दरम्यान, आरोपीच्या पिवळ्या कॅरीबॅगमध्ये
- गांजा सदृश्य पदार्थाच्या १३ पिशव्या (एकूण वजन — २०४ ग्रॅम)
- डिजिटल वजनकाटा
- दोन मोबाईल फोन
- रोख ३,५०० रुपये
असा एकूण ४९,७००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
चौकशीत आरोपी हा गांजा विक्रीसाठी ताब्यात बाळगत असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्याच्याविरुद्ध रत्नागिरी शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि. नं. ४५४/२०२५, NDPS Act 1985 च्या कलम ८(क), २० (ब) (ii) (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.
या कारवाईत स.पो.नि. शबनम मुजावर (प्रभारी अधिकारी – महिला कक्ष), श्रेणी. पो.उनि. संदीप ओगले, पो.हवा. विजय आंबेकर, पो.हवा. योगेश नार्वेकर आणि पो.हवा. दीपराज पाटील यांनी सहभाग घेतला.
जिल्हा पोलीस दलाने सुरू केलेल्या या सातत्यपूर्ण मोहिमेमुळे अमली पदार्थांच्या अवैध धंद्यांवर मोठा वचक निर्माण झाल्याचे पोलीस प्रशासनाने सांगितले.














