रत्नागिरी जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्था, ट्रस्ट व बचत गटांसाठी CSR कार्यशाळेचे आयोजन
२०२६ साठी CSR निधी मिळविण्यासाठी स्वयंसेवी संस्थांनी सज्ज व्हावे – डॉ. सौ. सुनिताताई मोडक
रत्नागिरी | प्रतिनिधी
केंद्र सरकारच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) धोरणाअंतर्गत २०२६ या आर्थिक वर्षासाठी विविध कंपन्यांकडून सामाजिक उपक्रमांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना, ट्रस्ट व स्वयंसहायता बचत गटांनी आतापासूनच नियोजनपूर्वक तयारी सुरू करावी, असे आवाहन सेवाभावी संस्था प्रबोधन समितीच्या राज्याध्यक्षा डॉ. सौ. सुनिताताई मोडक यांनी केले आहे.
याच अनुषंगाने रत्नागिरी जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्था, ट्रस्ट व बचत गटांसाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा रविवार, दिनांक ११ जानेवारी २०२६ रोजी, माध्यमिक शिक्षक पतसंस्था सभागृह, साळवी स्टॉप, रत्नागिरी येथे होणार आहे.
डॉ. मोडक यांनी सांगितले की, २०२६ हे वर्ष स्वयंसेवी संस्थांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. CSR निधी मिळविण्यासाठी संस्थांनी आपली नोंदणी कागदपत्रे, 12A व 80G प्रमाणपत्रे, लेखापरीक्षित अहवाल, मागील कामाचा अनुभव तसेच प्रभावी व परिणामकारक प्रकल्प अहवाल तयार ठेवणे अत्यावश्यक आहे. CSR मार्गदर्शक तत्त्वांनुसार पारदर्शकता, विश्वासार्हता व सामाजिक परिणाम दाखविणाऱ्या संस्थांना निधी मिळण्याची शक्यता अधिक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कंपनी कायदा २०१३ नुसार ठराविक उलाढाल व नफा असलेल्या कंपन्यांना त्यांच्या सरासरी नफ्याच्या किमान २ टक्के रक्कम सामाजिक उपक्रमांसाठी खर्च करणे बंधनकारक आहे. शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, पर्यावरण संरक्षण, ग्रामीण विकास, कौशल्य विकास व डिजिटल साक्षरता या क्षेत्रांत कार्यरत संस्थांसाठी ही मोठी संधी आहे.
राज्यातील अनेक औद्योगिक समूह, आयटी कंपन्या तसेच उत्पादन क्षेत्रातील उद्योग २०२६ साठी त्यांच्या CSR योजना लवकरच जाहीर करणार असल्याने इच्छुक संस्थांनी कंपन्यांशी संवाद साधण्यासाठी योग्य प्रस्ताव सादर करण्याची तयारी आत्ताच करावी, असेही आवाहन करण्यात आले.
या कार्यशाळेचे नियोजन सामाजिक कार्यकर्ते राजू भाटळेकर, सेवाभावी संस्था प्रबोधन समितीच्या जिल्हाध्यक्षा संजना मोहिते, प्रकोष्ठ समिती जिल्हाध्यक्षा वर्षाराजे निंबाळकर, उपाध्यक्ष विकास चव्हाण, प्रसाद मोहरकर, राज्य सदस्य किशोर सावंत, विनायक खानविलकर, नुपूरा मुळ्ये, अविनाश ऊर्फ राजू जाधव, प्रभाकर धावडे, संतोष घुमे, विनय पाटोळे, रक्षिता पालव, सलोनी मोरे, राजेश आंबेकर, अंतरा मोहिते, संजय भागवत आदी पदाधिकारी करीत आहेत.















