फुंणगूस गाव सुरक्षेच्या बाबतीत रामभरोसे; सरपंच व ग्रामसेवकांच्या बेजबाबदार कारभाराचा पर्दाफाश
रत्नागिरी:- निलेश रहाटे
फुंणगूस ग्रामपंचायतीच्या हद्दीत गावाच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला असून, याला थेट सरपंच अशोक पांचाळ आणि ग्रामसेवक अशोक भुते यांची निष्क्रियता, दुर्लक्ष व बेजबाबदार कारभार कारणीभूत असल्याचा गंभीर आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते सुभाष लांजेकर यांनी केला आहे.
दि. १५ ऑगस्ट २०२४ रोजी ग्रामपंचायतीच्या नूतनीकरण कामामुळे अंगणवाडी शाळेत पार पडलेल्या ग्रामसभेत, गावात येणाऱ्या बाहेरील फेरीवाल्यांवर निर्बंध घालणे, अनोळखी व्यक्तींना प्रवेशबंदी करणे तसेच गावाच्या सुरक्षेसाठी चौकाचौकात सूचना फलक लावण्याचा ठराव जाहीरपणे करण्यात आला होता. या ग्रामसभेला सरपंच अशोक पांचाळ, उपसरपंच व इतर मान्यवर उपस्थित होते.
मात्र, या ठरावाला अनेक महिने उलटूनही आजतागायत एकही सुरक्षा फलक लावण्यात आलेला नाही. कोणताही लेखी ठराव, परिपत्रक किंवा अंमलबजावणी झालेली नसून, केवळ घोषणा आणि पोकळ आश्वासनांपुरतेच ग्रामपंचायतीचे काम मर्यादित राहिल्याचे लांजेकर यांनी स्पष्ट केले.
गावात महिला, वृद्ध आणि लहान मुलांची संख्या मोठी असताना सुरक्षेला प्राधान्य देणे अत्यावश्यक असतानाही, सरपंच व ग्रामसेवकांनी याकडे पूर्णतः दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संदर्भात वारंवार पत्रव्यवहार, प्रत्यक्ष भेटी तसेच ग्रामसभेत प्रश्न उपस्थित करूनही कोणतीही ठोस कार्यवाही झाली नसल्याचे त्यांनी सांगितले.
अलीकडील ग्रामपंचायतीच्या बैठकीत ग्रामसेवक अशोक भुते यांना थेट प्रश्न विचारला असता, “मी सध्या फुंणगूस ग्रामपंचायतीत कार्यरत नाही,” असे उत्तर देण्यात आले. मात्र, याच आठवड्यात ते ग्रामपंचायतीत उपस्थित असल्याचे ग्रामस्थांनी पाहिल्याने, फुंणगूस ग्रामपंचायतीचा अधिकृत ग्रामसेवक नेमका कोण, हा प्रश्नच निर्माण झाला असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
दरम्यान, परिस्थिती अधिकच भयावह बनली असून, एक अनोळखी व्यक्ती गावात घराघरांत फिरून कुटुंबातील सदस्यांची संख्या, व्यवसाय यासारखी संवेदनशील माहिती गोळा करत असल्याचे समोर आले आहे. यामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले असून, याप्रकरणी एका महिलेने थेट पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे.
जर ग्रामसभेत घेतलेल्या निर्णयांची वेळीच अंमलबजावणी झाली असती, तर आज गावात अशी असुरक्षित परिस्थिती उद्भवली नसती, असे मत माहिती अधिकार कार्यकर्ते सुभाष लांजेकर यांनी व्यक्त केले आहे.
आजपर्यंत ना सुरक्षा फलक, ना ठरावांची अंमलबजावणी, ना ठोस कारवाई झाल्याने गावाच्या सुरक्षेशी थेट खेळ केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
👉 भविष्यात फेरीवाले किंवा अनोळखी व्यक्तींमुळे गावात कोणतीही अनुचित घटना घडल्यास, त्याची संपूर्ण जबाबदारी सरपंच अशोक पांचाळ व संबंधित ग्रामसेवक यांचीच राहील, असा ठाम इशारा लांजेकर यांनी दिला आहे.
तसेच ग्रामस्थांनी आपली वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नये व संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.














