गुहागर तालुक्यातील काँग्रेसचे माजी अध्यक्ष श्री. मिलिंद आत्माराम चाचे यांची भूमिका कोणाच्या पारड्यात?
गुहागर –
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत काही अपरिहार्य कारणांमुळे निवडणूक रिंगणात नसलेले गुहागर तालुका काँग्रेसचे माजी अध्यक्ष श्री. मिलिंद आत्माराम चाचे यांची नेमकी भूमिका काय असणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे. विशेषतः पडवे पंचायत समिती गणात त्यांच्या भूमिकेचा थेट परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मिलिंद चाचे हे निवडणूक लढवत नसले, तरी तालुक्यात त्यांचा वैयक्तिक संपर्क मोठ्या प्रमाणावर असून कार्यकर्त्यांमध्ये त्यांची पकड अजूनही मजबूत आहे. त्यामुळे ते कोणाच्या बाजूने सहकार्य करतात, यावर मतांचे गणित बदलू शकते, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.
महत्त्वाचे म्हणजे, मिलिंद चाचे हे आजही काँग्रेस पक्षातच सक्रिय असून त्यांनी आतापर्यंत काँग्रेस किंवा आघाडीविरोधात कोणतेही वक्तव्य केलेले नाही. त्यामुळे महाविकास आघाडीचे घटक म्हणून ते आघाडीच्या उमेदवारांना अप्रत्यक्ष किंवा प्रत्यक्ष सहकार्य करतील, असा कयास बांधला जात आहे.
जर मिलिंद चाचे यांनी आघाडीच्या उमेदवारांच्या बाजूने सक्रिय भूमिका घेतली, तर पडवे पंचायत समिती गणातील निवडणूक लढतीवर त्याचा निश्चितच प्रभाव पडू शकतो. त्यामुळे “मिलिंद चाचे यांचा कल नेमका कोणाकडे?” हा प्रश्न सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे.















