मुंबई महापौर निवडणूक बिनविरोधच्या दिशेने; ठाकरे गटाची माघार, किशोरी पेडणेकरांची स्पष्ट भूमिका
:
“मराठी माणूस जिंकत असेल तर आम्ही विघ्न आणणार नाही”; सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करण्याचा निर्धार
मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीत एक महत्त्वपूर्ण राजकीय घडामोड घडली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने (ठाकरे गट) या निवडणुकीत आपला उमेदवार न उभा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महापौरपदाची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
‘मातोश्री’ येथे पार पडलेल्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीनंतर माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी माध्यमांशी संवाद साधत पक्षाची भूमिका स्पष्ट केली. त्या म्हणाल्या, “मुंबईच्या महापौरपदी जर मराठी माणूस विराजमान होत असेल, तर आम्ही त्यात मिठाचा खडा टाकणार नाही. मराठी अस्मिता आणि स्वाभिमान आमच्यासाठी कोणत्याही राजकीय गणितापेक्षा मोठा आहे.”
पुढे त्या म्हणाल्या की, “संख्याबळ आमच्या बाजूने नसले तरी बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईत रुजवलेली मराठी अस्मिता जपणे हे आमचे कर्तव्य आहे. त्याच भूमिकेतून आम्ही हा निर्णय घेतला आहे.”
महापालिकेत सक्षम आणि जबाबदार विरोधी पक्ष म्हणून काम करू, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. “मुंबईकरांच्या प्रश्नांवर आमचा आवाज कायम बुलंद राहील. सत्ताधाऱ्यांकडून केले जाणारे आरोप आम्हाला घाबरवू शकत नाहीत. कोणतीही चौकशी किंवा आरोपांना आम्ही ठामपणे सामोरे जाऊ,” असा इशारा त्यांनी दिला.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यापूर्वी ‘भाजपचा महापौर होणे हा मुंबईसाठी काळा दिवस ठरेल’ असे विधान केले होते. त्यावर स्पष्टीकरण देताना पेडणेकर म्हणाल्या की, राऊत यांचा रोख भविष्यातील संभाव्य परिस्थितीकडे होता. “आम्ही आमचा भूतकाळ आणि वर्तमान जपले आहे. पुढे काय घडेल, हे जनता पाहील,” असे त्या म्हणाल्या.
दरम्यान, ठाकरे गटाच्या या निर्णयाचे सत्ताधारी गटाकडून स्वागत करण्यात आले आहे. पेडणेकर यांच्या अनुभवाचा आदर राखून त्यांच्या विधायक सूचनांचा सकारात्मक विचार केला जाईल आणि मुंबईच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम केले जाईल, अशी भावना सत्ताधाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आली आहे.













