लांजा तालुक्यातील साटवली येथे माकडांचा उच्छाद; आंबा उत्पादक शेतकरी हवालदिल
कमी उत्पादन, वाढलेला खर्च आणि माकडांचा उपद्रव – साटवलीसह परिसरातील बागायतदारांचे मोठे नुकसान
लांजा, प्रतिनिधी :- जितेंद्र चव्हाण 
रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यात आंबा उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या साटवली गावात यंदा आंबा बागायतदार शेतकऱ्यांपुढे मोठे संकट उभे राहिले आहे. हवामानातील बदलामुळे आधीच आंबा उत्पादनात सुमारे ८० टक्क्यांपर्यंत घट झाली असून उरलेल्या आंब्यांवरही माकडांचा मोठ्या प्रमाणावर उपद्रव सुरू झाला आहे. त्यामुळे आंबा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत.
साटवली गावात आंब्याच्या मोठ्या प्रमाणात बागा असून अनेक शेतकरी आंबा व्यवसायावर अवलंबून आहेत. मात्र यंदा हवामानाच्या अनिश्चिततेमुळे आंबा पिकाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. उत्पादन कमी असतानाच वानरांनी बागांमध्ये घुसून आंबे खाणे व तोडून फेकणे सुरू केले आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या हातात येणारे थोडेफार उत्पादनही नष्ट होत आहे.
साटवलीसह सडवली, रूण आणि इसवली तसेच आसपासच्या गावांमध्येही माकडांच्या उपद्रवामुळे आंबा बागायतदारांचे मोठे नुकसान होत असल्याची तक्रार शेतकरी करत आहेत. आंबा उत्पादनासाठी केलेला खर्च आधीच मोठा असताना उत्पन्न घटल्याने शेतकऱ्यांची आर्थिक अडचण वाढली आहे.
या पार्श्वभूमीवर वन विभागाने या उपद्रवी वानरांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी स्थानिक आंबा बागायतदारांकडून होत आहे. याबाबत प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन उपाययोजना कराव्यात, अशीही अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.














