तळवली बौद्धवाडीत बिबट्याचा मुक्त संचार; शेतकरी राजाराम जाधव यांच्या पाळीव कुत्रीवर हल्ला
तळवली (प्रतिनिधी) – गुहागर तालुक्यातील तळवली येथील बौद्धवाडी परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मंगळवारी मध्यरात्री बिबट्याने तळवली बौद्धवाडी येथील शेतकरी राजाराम गोविंद जाधव यांच्या पाळीव कुत्रीवर हल्ला केला. या हल्ल्यात कुत्री थोडक्यात बचावली असली तरी तिच्या मानेवर बिबट्याने पंज्याने खोल जखम केली आहे.
ग्रामस्थांच्या माहितीनुसार, यापूर्वीही बिबट्याने परिसरातील दोन ते तीन पाळीव कुत्री फस्त केल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी गावात आणि शेत परिसरात जाण्यास ग्रामस्थ घाबरत आहेत.
बिबट्याचा वावर भरवस्तीत वाढत असल्याने तो केवळ पाळीव प्राण्यांवरच नव्हे तर माणसांवरही हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे.
ग्रामस्थांनी वनविभागाने तातडीने या परिसरात पाहणी करून पिंजरा लावावा आणि बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली आहे.
















