‘वंद्य वंदे मातरम्’च्या सहाव्या आवृत्तीचे उत्साहपूर्ण अनावरण
कल्याण (गुरुदत्त वाकदेकर): जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने अक्षरमंच प्रकाशनतर्फे डॉ. योगेश जोशी लिखित ‘वंद्य वंदे मातरम्’ या पुस्तकाच्या सहाव्या आवृत्तीचे अनावरण उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. प्रा. गजेंद्र दीक्षित, प्रा. शैलेश रेगे आणि लेखक हेमंत नेहते यांच्या हस्ते पुस्तकाचे अनावरण करण्यात आले.
‘वंदे मातरम्’ या गीताला ७ नोव्हेंबर २०२५ रोजी १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर युवा पिढीपर्यंत त्याचा इतिहास पोहोचावा, या उद्देशाने या पुस्तकाची पहिली आवृत्ती प्रकाशित करण्यात आली होती. आतापर्यंत या पुस्तकाच्या सुमारे ९ हजारांहून अधिक प्रती कल्याण-डोंबिवलीसह पुणे, नाशिक, रत्नागिरी आणि गोवा येथील शाळांमध्ये विनामूल्य वितरित करण्यात आल्या आहेत.
या उपक्रमाचे संकल्पनाकार डॉ. योगेश जोशी यांनी ७ नोव्हेंबर २०२६ पर्यंत २५ हजार प्रती विनामूल्य वितरित करण्याचा संकल्प यावेळी जाहीर केला. पुस्तकामध्ये ‘वंदे मातरम्’चे रचनाकार बंकिमचंद्र चटर्जी यांचे चरित्र, गीताची निर्मिती, ‘आनंदमठ’ कादंबरीचे कथासूत्र आणि या गीतामुळे घडलेली क्रांती यांचा समावेश आहे. तसेच संपूर्ण ‘वंदे मातरम्’ आणि त्याचा अर्थ विद्यार्थ्यांना सहज समजेल अशा सोप्या भाषेत मांडण्यात आला आहे. या उपक्रमामुळे ‘वंदे मातरम्’च्या इतिहासाची ओळख नव्या पिढीपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचत असून विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना अधिक दृढ होत आहे.
‘वंद्य वंदे मातरम्’ पुस्तकाच्या प्रती अक्षरमंच प्रकाशनच्या कार्यालयात उपलब्ध आहेत. शैक्षणिक संस्था, ग्रंथालये आणि क्लासेस यांना प्रती हव्या असल्यास प्रतिनिधींनी ९७५७०७७६१४ किंवा ८७७९६४४९९२ या क्रमांकांवर संपर्क साधावा.
















