महाराष्ट्र दिनी रत्नागिरीत विकासकामांचा वर्षाव; पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांचे मोठे घोषणापत्र
६७ व्या स्थापना दिनानिमित्त राष्ट्रध्वजाला मानवंदना; विमानतळ, रेल्वे स्टेशन, इको टुरिझम, संविधान भवनांसह अनेक प्रकल्पांची माहिती
रत्नागिरी, १ मे: महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त रत्नागिरी येथील पोलीस परेड ग्राऊंडवर मुख्य शासकीय सोहळा उत्साहात पार पडला. पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी राष्ट्रध्वज फडकावून मानवंदना दिली. यावेळी त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध विकासकामांची माहिती देत, राज्याच्या परंपरा आणि संस्कृतीला साजेसा विकास जिल्ह्यात सुरू असल्याचे सांगितले.
सोहळ्यास जिल्हाधिकारी मनुज जिंदल, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
रत्नागिरीत विकासकामांना गती
पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले की, रत्नागिरी विमानतळ उड्डाणासाठी सज्ज आहे, तर रेल्वे स्टेशनचे आधुनिकीकरण वेगाने सुरू आहे. जिल्हा प्रशासनाची नवीन इमारत १०० कोटी रुपयांत पूर्णत्वाकडे जात आहे. नगरपालिकेची आणि जिल्हा परिषदेची नवीन इमारतही पूर्ण झाली आहे.
पोलीस विभागासाठी १६९ कोटी रुपयांच्या निधीतून नवीन इमारतीचे बांधकाम सुरू असून, छत्रपती शिवाजी महाराज संशोधन केंद्र येत्या दोन ते तीन महिन्यांत लोकार्पणासाठी तयार होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आरेवारे किनाऱ्यावर इको टुरिझम प्रकल्प
आरेवारे किनाऱ्यालगत वन खात्याच्या जमिनीवर ५ कोटी रुपयांचा इको टुरिझम प्रकल्प उभारला जात असून तो डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार आहे. या प्रकल्पामुळे पर्यटनाला मोठी चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
शिक्षण क्षेत्रात मोठी भर
केंद्र शासनाच्या माध्यमातून रत्नागिरी केंद्रीय विद्यालयास मंजुरी मिळाली असून, नाचणे येथे अडीच हेक्टर जागा नाममात्र दराने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासात मोठी भर पडणार आहे.
तसेच जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांसाठी नासा आणि इस्त्रो अभ्यासदौऱ्याची योजना रत्नागिरीत सुरू करण्यात आली होती. या योजनेची दखल घेऊन ती आता संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शेतकरी आणि ग्रामीण विकासासाठी निधी
पालकमंत्र्यांनी सांगितले की, पीएम किसान योजनेचे २२ हप्ते वितरित झाले असून नमो किसान योजनेतून १ लाख ५९ हजार ५८९ शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे. फळपीक विम्यातून १०७ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत.
वंदनीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पांतर्गत ४.७८ कोटी रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे.
पाच मतदारसंघांत संविधान भवन
चिपळूण, गुहागर, मंडणगड, रत्नागिरी आणि राजापूर या पाच मतदारसंघांत प्रत्येकी ३ कोटी रुपयांचे संविधान भवन उभारण्यात येणार आहे. येथे UPSC आणि MPSC स्पर्धा परीक्षांसाठी प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान
कार्यक्रमात सागर कवच अभियानातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच स्टुडंट पोलीस कॅडेट कार्यक्रमात यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. पुण्यश्लोक अहिल्याबाई पुरस्कारही यावेळी वितरित करण्यात आला.
जनतेला सहकार्याचे आवाहन
“महाराष्ट्र राज्याच्या परंपरेला आणि संस्कृतीला साजेसा विकास रत्नागिरीत घडवत आहोत. या विकासाला जिल्ह्यातील जनतेने साथ द्यावी,” असे आवाहन पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी शेवटी केले.















