राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली
फेरफार मंजुरीसाठी लाचेची मागणी; मंडळ अधिकाऱ्यासह कारवाईच्या रडारवर
राजापूर– जितेंद्र चव्हाण. वार्ताहर
रत्नागिरी : राजापूर तालुक्यात फेरफार मंजूर करून देण्यासाठी २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना कोतवालाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडल्याची घटना समोर आली आहे. या कारवाईमुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे.
एसीबी रत्नागिरी युनिटने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या मौजे जवळे थर सर्वे नंबर १६०/७/अ, ता. राजापूर येथील जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर पतीचे नाव दाखल करण्यासाठी फेरफार मंजूर करून घेण्याची प्रक्रिया सुरू होती. यासाठी संबंधित मंडळ अधिकारी श्रीमती पुनम गावित यांनी २० हजार रुपयांची मागणी केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते.
या प्रकरणात राजापूर पोलिस ठाणे हद्दीतील कोतवाल श्रीमती संजना माने यांनी तक्रारदाराकडे लाचेची मागणी करून ती स्वीकारण्यास तयारी दर्शवली होती. तक्रारीची पडताळणी १४ मे २०२६ रोजी करण्यात आली. त्यानंतर एसीबीने सापळा रचून कोतवाल संजना माने यांना २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना ताब्यात घेतले.
या कारवाईनंतर मंडळ अधिकारी श्रीमती पुनम गावित यांनाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ही कारवाई पोलीस उपअधीक्षक अविनाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात पोलीस निरीक्षक श्री. मच्छिंद्र जाधव, श्री. सुहास रोकडे, पोलीस हवालदार विशाल नलावडे, दीपक औंधकर, पोलीस नाईक दीपक पवार, राजेश गावकर, महिला पोलीस कॉन्स्टेबल वैशाली घाणेकर, स्मिता हिरसागर आणि चालक पोलीस हवालदार प्रशांत कांबळे यांचा समावेश होता.
नागरिकांना एसीबीचे आवाहन
कोणताही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी शासकीय कामासाठी लाचेची मागणी करत असल्यास नागरिकांनी तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन एसीबी रत्नागिरीकडून करण्यात आले आहे.
















