अकरावी प्रवेश 2026 : पहिली गुणवत्ता यादी उद्या जाहीर; 21 लाखांहून अधिक जागांसाठी 9 लाख विद्यार्थ्यांचे अर
मुंबई विभागात सर्वाधिक नोंदणी; पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाल्यास प्रवेश घेणे बंधनकारक
मुंबई : राज्यातील अकरावी प्रवेश प्रक्रियेची पहिली गुणवत्ता यादी उद्या शुक्रवारी सकाळी ११ वाजता जाहीर होणार आहे. यंदा राज्यभरातील ९ हजार ५९१ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये तब्बल २१ लाख ९८ हजार ६६६ जागा उपलब्ध असून, पहिल्या नियमित फेरीसाठी ९ लाख ४ हजार विद्यार्थ्यांनी अर्जाचा भाग-२ भरला आहे. त्यामुळे पहिल्या यादीत किती विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार याकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागले आहे.
शिक्षण विभागाच्या माहितीनुसार, नियमित फेरीसाठी एकूण १७ लाख ४२ हजार ४२३ जागा उपलब्ध आहेत. यापूर्वी झालेल्या शून्य फेरीत कोटा प्रवेशातून ३९ हजार ६१३ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. त्यामुळे सध्या २१ लाख ५९ हजार ५३ जागा रिक्त आहेत.
अकरावी प्रवेशासाठी राज्यभरातून १२ लाख ४९ हजार ५१६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, त्यापैकी ९ लाख ४ हजार विद्यार्थ्यांनी अर्जाचा भाग-२ भरून पहिल्या नियमित फेरीत सहभाग नोंदवला आहे.
२९ मे ते ३ जूनदरम्यान प्रवेश प्रक्रिया
नियमित फेरी-१ ची प्रवेश प्रक्रिया २९ मे ते ३ जून २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. गुणवत्ता यादीत नाव आलेल्या विद्यार्थ्यांना संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करावा लागणार आहे.
शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे की, विद्यार्थ्याला पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाल्यास त्या ठिकाणी प्रवेश घेणे बंधनकारक असेल. जर विद्यार्थ्याने प्रवेश घेतला नाही किंवा प्रवेश नाकारला, तर पुढील एका फेरीसाठी त्याला प्रतिबंधित करण्यात येणार आहे.
मुंबई विभागात सर्वाधिक अर्ज
यंदाही मुंबई विभागात सर्वाधिक नोंदणी झाली आहे. मुंबई विभागातून २ लाख ६९ हजार ५४२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, त्यापैकी २ लाख १६ हजार ९८५ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत.
तर पुणे विभागात २ लाख ७ हजार ७९४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, त्यातील १ लाख ६८ हजार १३४ विद्यार्थी पहिल्या फेरीत सहभागी झाले आहेत. नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि कोल्हापूर विभागातही मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल झाले आहेत. लातूर विभागातून सर्वात कमी, म्हणजे ६४ हजार ५५० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
अल्पसंख्याक आणि इनहाउस कोट्यालाही मोठा प्रतिसाद
अल्पसंख्याक, व्यवस्थापन आणि इनहाउस कोट्यांतर्गतही मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल झाले आहेत. अल्पसंख्याक कोट्यात ४२ हजारांहून अधिक अर्ज प्राप्त झाले असून, त्यापैकी केवळ मुंबई विभागातच १७ हजारांपेक्षा जास्त अर्ज आहेत. तर इनहाउस कोट्यासाठी ४२ हजार ६३५ अर्ज भरले गेले आहेत.
दरम्यान, विद्यार्थ्यांनी गुण आणि मागील वर्षांच्या कटऑफचा विचार करून पसंतीक्रम भरल्यास पहिल्याच यादीत प्रवेश मिळण्याची शक्यता अधिक असल्याचे शिक्षण विभागाने सांगितले आहे.
















