सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्रात स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती साजरी
सावरकरांचे विचार आणि रत्नागिरीतील कार्य प्रेरणादायी: डॉ. केतनकुमार चौधरी
रत्नागिरी, दिनांक २८ मे २०२६:
डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ अंतर्गत, झाडगाव, रत्नागिरी येथील सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्रात गुरुवारी, दिनांक २८ मे रोजी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची १४३ वि जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी संशोधन केंद्रातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. यावेळी डॉ. केतनकुमार चौधरी, वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी आणि विभाग प्रमुख, सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सावरकरांच्या देशकार्यावर आणि विशेषतः त्यांच्या रत्नागिरीतील वास्तव्या दरम्यानच्या कार्यावर प्रकाश टाकला. “स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी अथांग कष्ट उपसले. रत्नागिरीत असताना त्यांनी समाजसुधारणेचे जे अफाट कार्य केले, ते थक्क करणारे आहे. अस्पृश्यता निवारण, पतितपावन मंदिराची स्थापना आणि भाषाशुद्धी यांसारख्या चळवळींतून त्यांनी समाजाला नवी दिशा दिली. त्यांचे विचार आजही तरुणांसाठी तितकेच मार्गदर्शक आहेत,” असे डॉ. केतन चौधरी यांनी आपल्या भाषणात नमूद केले. कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रप्रेमाने भारलेल्या वातावरणात झाला. या उपक्रमाबद्दल संशोधन केंद्रातील उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.













