राज्यभरात एफडीएची धडक कारवाई; ७३ लाखांचा मिसब्रँडेड औषधसाठा जप्त
आक्षेपार्ह जाहिराती आणि अवैध औषध विक्रीविरोधात सात जिल्ह्यांत मोहीम; तुकाराम मुंढे यांचा कठोर इशारा
मुंबई : राज्यभरात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) आक्षेपार्ह जाहिराती आणि मिसब्रँडेड औषधांविरोधात मोठी धडक मोहीम राबवत सात जिल्ह्यांतील १२ आयुर्वेदिक औषध विक्री आस्थापनांवर कारवाई केली. या कारवाईत तब्बल ७३ लाख २४ हजार ६५६ रुपये किमतीचा औषधसाठा जप्त करण्यात आला आहे.
‘औषधे व जादूटोणा विरोधी (आक्षेपार्ह जाहिराती) कायदा १९५४’ अंतर्गत ही मोहीम राबवण्यात आली असून, राज्यभरातील भ्रामक जाहिराती आणि अवैध औषध विक्रीविरोधात कठोर पावले उचलण्यात येत आहेत.
जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे. “भ्रामक व दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रसिद्ध करणे तसेच अवैध औषध उत्पादन आणि विक्री करणाऱ्यांविरोधातील कारवाई यापुढे अधिक कठोर आणि सातत्यपूर्ण असेल,” असे त्यांनी म्हटले आहे.
‘औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४०’ तसेच संबंधित कायदे व नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात थेट न्यायालयीन कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सुरक्षित अन्न आणि औषध हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार असून तो सुनिश्चित करणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले.
एफडीएने नागरिकांनाही महत्त्वाचे आवाहन केले आहे. कोणत्याही भ्रामक जाहिरातींना बळी न पडता स्वतःच्या मनाने औषधांचे सेवन करू नये. सेल्फ मेडिकेशनमुळे गंभीर आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात. संशयास्पद औषध किंवा जाहिरातींबाबत प्रशासनाकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
तक्रार प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी लवकरच नवीन मोबाईल ॲप विकसित करण्यात येणार असून, नागरिकांसाठी टोल-फ्री क्रमांकही कार्यान्वित करण्यात आला आहे. औषधांच्या दर्जाबाबत शंका असल्यास किंवा अवैध साठवणुकीची माहिती मिळाल्यास नागरिकांनी तातडीने एफडीएकडे तक्रार करावी, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
तक्रार करताना नाव, पत्ता, संपर्क क्रमांक, संशयित आस्थापनेचा अचूक पत्ता आणि औषधाचे नाव स्पष्टपणे नमूद करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांकडून मिळणाऱ्या सर्व तक्रारींची गोपनीयतेने पडताळणी करून तात्काळ कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी माहिती सह आयुक्त (औषधे) गणेश रा. रोकडे यांनी दिली.
आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार बृहन्मुंबई, कोकण, पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर विभागांमध्ये विशेष मोहीम राबविण्यात आली.














