दापोलीत कौटुंबिक वाद मिटविण्याच्या बहाण्याने दोन भावांवर हल्ला
जालगाव यथे फायटरने वार; आरोपीविरुद्ध दापोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
रत्नागिरी -दापोली तालुक्यातील जालगाव येथे कौटुंबिक वाद मिटविण्याच्या बहाण्याने बोलावून दोन भावांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी दापोली पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सनी प्रकाश पवार (वय ३२, रा. नवशी शिगवणवाडी, ता. दापोली) यांना ५ जून २०२६ रोजी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास संशयित आरोपी प्रमोद बजीरंग साळंखे (रा. मराठी शाळेजवळ, जालगाव, ता. दापोली) याने फोन करून त्यांच्या बहिणी मनिषा दयानंद चव्हाण आणि मेहुणे दयानंद सर्जेराव चव्हाण यांच्यातील वाद मिटविण्यासाठी घराजवळ बोलावले होते.
सनी पवार हे त्यांचे भाऊ सचिन प्रकाश पवार यांच्यासह घटनास्थळी गेले असता आरोपीने त्यांच्याशी शिवीगाळ व दमदाटी केली. त्यानंतर आरोपीने जवळ असलेल्या फायटरने सनी पवार यांच्या डाव्या कानाजवळ तसेच डोक्यावर वार करून त्यांना जखमी केले. मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या सचिन पवार यांनाही मारहाण करण्यात आली असून त्यांच्या ओठाला दुखापत झाली आहे.
फिर्यादीत नमूद केल्यानुसार, आरोपीने “तुम्हा दोघांना बघून घेतो” अशी धमकीही दिली. या घटनेत दोन्ही भाऊ जखमी झाले असून परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
याप्रकरणी दापोली पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ११५/२०२६ नोंद करण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम ११८(१), ३५१(२), ३५२ तसेच भादंवि कलम ३२४, ५०४ आणि ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास दापोली पोलिस करीत आहेत.















