इंडिया आघाडीत मतभेदांवर तोडगा निघेल; पक्षांनी टोकाची भूमिका टाळावी : शरद पवार
बारामतीत पत्रकार परिषदेत सल्ला; कर्जमाफीच्या अटींमध्ये सुधारणा करण्याचीही मागणी
बारामती : इंडिया आघाडीतील सर्व पक्षांनी एकत्र येऊन काम करावे, अशी सर्वांची भूमिका असून मतभेदांवर चर्चा करून मार्ग काढण्यात येणार आहे. त्यामुळे कोणत्याही पक्षांनी टोकाची भूमिका घेऊ नये, असा सल्ला ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिला.
बारामती येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आगामी तीन वर्षांत कोणत्याही मोठ्या निवडणुका नसल्याने सर्वांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
देशात सध्या दोन प्रमुख राजकीय गट दिसत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप व त्यांचे सहकारी हा एक गट असून त्यांच्या विचारांशी असहमती असलेला दुसरा गट आहे, असे पवार यांनी सांगितले.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये इंडिया आघाडीतील काही पक्षांनी एकत्रितपणे तर काही ठिकाणी स्वतंत्रपणे निवडणूक लढवली. त्यामुळे प्रमुख नेत्यांशी चर्चा करून मतभेदांवर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले. इंडिया आघाडीच्या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या वतीने खासदार सुप्रिया सुळे उपस्थित राहिल्या होत्या. पुढील चर्चा दिल्लीत होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, कर्जमाफी योजनेतील निकषांमध्ये सुधारणा करण्याची गरज असल्याचेही शरद पवार यांनी स्पष्ट केले. अनेक अटी शेतकऱ्यांसाठी अडचणीच्या ठरत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारशी चर्चा करून त्या अटींमध्ये बदल करावेत, अशी मागणी त्यांनी केली.
राज्यात केळी आणि ऊस पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचे सांगत वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकडून तज्ज्ञांचे पथक पाहणीसाठी पाठवण्यात आले होते. त्या पथकाचा अहवाल प्राप्त झाला असून आवश्यक उपाययोजनांबाबत निवेदन देण्यात आल्याची माहितीही पवार यांनी दिली.















