राजापूरच्या वाहतूक सेवेला नवे बळ!
आमदार किरण सामंत यांच्या हस्ते दोन नवीन एसटी बसांचे लोकार्पण
राजापूर –
राजापूर तालुक्यातील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ठरलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या राजापूर आगारात दोन नवीन एसटी बस गाड्यांचे लोकार्पण आमदार किरण सामंत यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. या नवीन गाड्यांमुळे राजापूर आगाराच्या ताफ्यात भर पडून प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी आणि दर्जेदार प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे.
राजापूर तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागातील वाढत्या प्रवासी संख्येचा विचार करून या नवीन बस गाड्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांसह नोकरदार, ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामीण भागातील नागरिकांना नियमित व सुलभ वाहतूक सेवा मिळण्यास मदत होणार आहे.
यावेळी बोलताना आमदार किरण सामंत यांनी सांगितले की, मतदारसंघातील नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. ग्रामीण विकासाचा कणा असलेल्या वाहतूक व्यवस्थेला अधिक सक्षम करण्यासाठी शासन स्तरावर आवश्यक पाठपुरावा केला जात असून, एसटी सेवा सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनाचा महत्त्वाचा भाग असल्याचे त्यांनी नमूद केले.
राजापूर आगाराच्या सेवेत भविष्यात आणखी सुधारणा करून आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू राहतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमास एसटी महामंडळाचे अधिकारी, आगार व्यवस्थापन, कर्मचारी, लोकप्रतिनिधी तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवीन बस गाड्या सेवेत दाखल झाल्यामुळे प्रवाशांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, अधिक सक्षम आणि वेळेवर सेवा देण्यासाठी एसटी प्रशासन कटिबद्ध असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
चौकट
“नवीन बस, अधिक विश्वास”
राजापूर आगारात दाखल झालेल्या दोन नवीन एसटी बसांमुळे प्रवाशांच्या सोयीसुविधांमध्ये भर पडणार असून, ग्रामीण भागातील वाहतूक सेवा अधिक गतिमान आणि प्रभावी होण्यास मदत होणार आहे.
बातमीदार -संदीप शेमणकर.













