*’मिशन अभय’ अभियानांतर्गत जि. प. आदर्श शाळा शिवणे नं. २ मध्ये पालक सभा उत्साहात संपन्न
*बालकांच्या सुरक्षेसाठी पालक व शिक्षकांनी कटिबद्ध राहण्याचे आवाहन
आबलोली (संदेश कदम )
बालकांचे लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण व्हावे, त्यांना सुरक्षित व भयमुक्त वातावरण मिळावे या उद्देशाने राबवण्यात येत असलेल्या ‘मिशन अभय’ अभियानांतर्गत जिल्हा परिषद आदर्श शाळा शिवणे नं. २ येथे विशेष पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत शाळा व्यवस्थापन समिती, पालक आणि शिक्षकांची समुपदेशक म्हणून असणारी भूमिका व जबाबदाऱ्या यांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेचे मुख्याध्यापक दिनेश काशिनाथ जाक्कर यांनी ‘मिशन अभय’ या उपक्रमाची सविस्तर ओळख करून दिली. प्रास्ताविकात बोलताना ते म्हणाले, “सध्याच्या काळात बालकांचे मानसिक व शारीरिक संरक्षण करणे हे केवळ प्रशासनाचे काम नसून शाळा आणि पालकांची संयुक्त जबाबदारी आहे. मुलांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी आणि कोणत्याही अपप्रवृत्तीविरुद्ध आवाज उठवण्यासाठी हे अभियान मैलाचा दगड ठरेल.”
पाचेरी आगर केंद्राच्या केंद्रप्रमुख गीतांजली जाधव मॅडम यांनी मुख्य मार्गदर्शक म्हणून उपस्थितांना संबोधित केले. त्या म्हणाल्या, “बालकांवरील अत्याचार रोखण्यासाठी सर्वात आधी घरातील व शाळेतील संवाद मोकळा असणे गरजेचे आहे. शिक्षकांनी केवळ वर्गात शिकवण्यापुरते मर्यादित न राहता विद्यार्थ्यांचे समुपदेशक बनून त्यांच्यातील वर्तणुकीतील किंवा मानसिक बदलांकडे बारकाईने लक्ष दिले पाहिजे. तसेच पालकांनीही पाल्याशी रोज संवाद साधून त्याला ‘गुड टच’ आणि ‘बॅड टच’ याबद्दल व सुरक्षेच्या नियमांबद्दल जागृत केले पाहिजे.”
या कार्यक्रमास शिवणे गावच्या सरपंच मनस्वी ठोंबरे आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष सुप्रिमी जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. सरपंच मनस्वी ठोंबरे यांनी शाळेच्या या कौतुकास्पद उपक्रमाचे स्वागत करत गावाच्या वतीने पूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले. या सभेला शाळेतील सर्व उपशिक्षक, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, मोठ्या संख्येने पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
सदर संपूर्ण कार्यक्रमाचे नेटके व प्रभावी सूत्रसंचालन उपशिक्षक प्रदिप बोंद्रे यांनी केले. त्यांनी बालसुरक्षेच्या कायद्यांविषयी आणि अभियानाच्या महत्त्वावर आपल्या निवेदनातून प्रकाश टाकला. उपस्थितांनी विचारलेल्या विविध शंकांचे निरसन करून आणि बालकांच्या सुरक्षिततेची शपथ घेऊन सभेची सांगता करण्यात आली.








