सागरी महामार्गावरील निकृष्ट दुरुस्तीवर कोंडये ग्रामपंचायत आक्रमक
: ₹३५ लाखांचा खर्च करूनही २ ते ४ महिन्यांत रस्ता पुन्हा खड्डेमय; गणेशोत्सवापूर्वी दुरुस्ती न झाल्यास आंदोलनाचा इशारा
लांजा (प्रतिनिधी, जितेंद्र चव्हाण) : राज्य महामार्ग क्र. १६८ अर्थात सागरी महामार्गावरील निकृष्ट दर्जाच्या दुरुस्तीमुळे रस्ता पुन्हा खड्डेमय झाला असून, या प्रकाराबाबत कोंडये ग्रामपंचायतीने आक्रमक भूमिका घेतली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने रस्त्याची योग्य पद्धतीने दुरुस्ती करावी, अशी मागणी कोंडये ग्रामपंचायतीचे सरपंच मनोज सखाराम चंदूरकर यांनी केली आहे.
लांजा शहरातून कोंडये हद्दीतून साटवलीच्या दिशेने जाणाऱ्या या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी शासनाकडून तब्बल ₹३५ लाख २१ हजार ३९१ रुपये खर्च करण्यात आले. मात्र, दुरुस्ती झाल्यानंतर अवघ्या दोन ते चार महिन्यांतच अनेक ठिकाणी खड्डे पुन्हा पडल्याने कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
३५ लाखांचा खर्च, तरीही रस्ता खड्डेमय
सार्वजनिक निधीतून मोठा खर्च करून करण्यात आलेली दुरुस्ती अल्पावधीतच निकामी होत असेल, तर या कामाची गुणवत्ता तपासली गेली होती का? तसेच निकृष्ट कामाची जबाबदारी कोणाची, असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. खड्ड्यांमुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, अपघाताचा धोका देखील वाढला आहे.
गणेशोत्सवापूर्वी रस्ता दुरुस्त करण्याची मागणी
गणेशोत्सवाच्या काळात मुंबईसह राज्यातील विविध शहरांमधून मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात दाखल होतात. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्यापूर्वी रस्त्यावरील खड्डे कायमस्वरूपी बुजवून वाहतुकीसाठी रस्ता सुरक्षित करावा, अशी मागणी सरपंच मनोज चंदूरकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
दुरुस्ती न झाल्यास आंदोलन
गणेशोत्सवापूर्वी रस्त्याची योग्य पद्धतीने दुरुस्ती न झाल्यास पंचक्रोशीतील ग्रामस्थ आणि चाकरमानी यांना एकत्र करून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा सरपंच मनोज चंदूरकर यांनी दिला आहे. आंदोलनामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील, असेही त्यांनी निवेदनात स्पष्ट केले आहे.
आता सार्वजनिक बांधकाम विभाग या तक्रारीची दखल घेऊन रस्त्याची कायमस्वरूपी दुरुस्ती कधी करणार, याकडे कोंडये परिसरातील ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.








