गुहागर एसटीच्या अडचणी परिवहन विभागाने मान्य केल्या; पण ‘पुढील काळ’ कधी येणार? मिलिंद चाचे
गुहागर (सुजित सुर्वे):
गुहागर आगारातील एसटी बससेवेचा विस्कळीत कारभार, वाहनांची कमतरता आणि चालक-वाहकांची अपुरी संख्या यामुळे विद्यार्थी, प्रवासी आणि नोकरदार वर्गाला मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत असल्याची तक्रार सातत्याने होत आहे. विशेष म्हणजे, आता या तक्रारींवर खुद्द राज्य परिवहन विभागानेच शिक्कामोर्तब केले असून, गुहागर आगारात वाहन तसेच चालक-वाहकांची कमतरता असल्याचे अधिकृत पत्रातून स्पष्टपणे मान्य करण्यात आले आहे.
गुहागर तालुका माजी अध्यक्ष मिलिंद चाचे यांनी गुहागर आगारातील बससेवा आणि चालक-वाहकांच्या समस्येबाबत निवेदन दिले होते. त्यावर रत्नागिरी विभाग नियंत्रकांनी दिलेल्या उत्तरात आगारातील सद्यस्थिती स्पष्ट करण्यात आली आहे.
विभागाच्या पत्रानुसार, गुहागर आगारासाठी मंजूर नियतांनुसार आवश्यक असलेल्या वाहनांच्या तुलनेत प्रत्यक्ष उपलब्ध वाहने कमी आहेत. त्याचबरोबर चालक-वाहकांचीही कमतरता असल्याने काही नियोजित फेऱ्या स्थगित ठेवण्याची वेळ येत असल्याचे विभागाने मान्य केले आहे. परिणामी विद्यार्थ्यांना आणि प्रवाशांना वेळेवर एसटी उपलब्ध होत नसून, त्यांच्या गैरसोयीचा प्रश्न निर्माण होत आहे.
विशेष म्हणजे, विभागाने आपल्या पत्रात “पुढील काळामध्ये वाहन तसेच चालक/वाहकांची नव्याने उपलब्धता होताच सदरच्या अडचणी दूर करण्यात येतील”, असे आश्वासन दिले आहे.
मात्र आता सर्वसामान्य प्रवाशांचा सवाल अधिक गंभीर आहे—“पुढील काळ नेमका कधी येणार?”
विद्यार्थ्यांची शाळा-महाविद्यालये आज सुरू आहेत. नोकरदारांना आज कामावर जायचे आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना आज दवाखाना, बाजारपेठ किंवा शासकीय कार्यालय गाठायचे आहे. मग त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी त्यांना आणखी किती काळ वाट पाहावी लागणार?
समस्या आहे, हे विभागाने मान्य केले. कमतरता आहे, हेही मान्य केले. काही फेऱ्या स्थगित होत आहेत, हेही मान्य केले. मग उपाययोजना करण्यासाठी ‘पुढील काळ’ची वाट का पाहायची?
रत्नागिरी विभागात एसटी सेवेतील विस्कळीतपणाबाबत यापूर्वीही प्रवाशांच्या तक्रारी समोर आल्या आहेत. अलीकडेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी जादा एसटी फेऱ्यांची मागणीही करण्यात आली होती.
गुहागर आगारातील ही परिस्थिती केवळ एका आगाराचा प्रश्न नसून, ग्रामीण भागातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न आहे. एसटी ही ग्रामीण भागातील हजारो नागरिकांची जीवनवाहिनी आहे. त्यामुळे वाहन आणि मनुष्यबळ उपलब्ध होईपर्यंत प्रवाशांनी गैरसोय सहन करावी, अशी अपेक्षा ठेवणे योग्य ठरणार नाही.
परिवहन विभागाने समस्या मान्य केली आहे; आता प्रवाशांना आश्वासन नको, तर ठोस तारीख आणि ठोस उपाययोजना हव्यात.
“पुढील काळात” नव्हे, तर “आत्तापासून” गुहागर आगारातील बंद अथवा स्थगित फेऱ्या कधी सुरू होणार, याचे उत्तर परिवहन विभागाने द्यावे, हीच प्रवाशांची अपेक्षा आहे.
रत्नागिरी विभाग मध्ये जी वाहक – चालक भरती होते ती परजिल्यातील उमेदवार जास्त भरती केले जातात, आणि काही काळ नोकरी केल्यानंतर हे उमेदवार आपल्या स्वतःच्या जिल्ह्यात बदली करून जातात परिणामी रत्नागिरी जिल्ह्यातील वाहक -चालक समस्या वर्षानुवर्षी तशीच कायम राहते त्याचा परिणाम रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांना सोसावा लागत आहे तरी या पुढील वाहक -चालक भरती करताना स्थानिक उमेदवारांना 50 टक्के तरी संधी मिळावी जेणेकरून यामध्ये स्थिरता येईल आणि जिल्ह्यातील नागरिकांना प्रचंड चा सामना करावा लागणार नाही याबाबत श्री मिलिंद आत्माराम चाचे यांनी वेळोवेळी मान्य परिवहन मंत्री माननीय परिवहन व्यवस्थापक संचालक यांना पत्र देऊन लक्ष वेधले आहे










