विधानसभेसाठी आजपासून उमेदवारी अर्जांची स्विकृती.
रत्नागिरी – महाराष्ट्र राज्याच्या विधान सभा निवडणुकीसाठी २२ ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होत असली, तरी गुरुपुष्यामृतचा मुहूर्त साधण्यासाठी बहुतांश मतदारसंघांत २४ ऑक्टोबर रोजीच अर्ज दाखल करण्यासाठी झुंबड उडण्याची शक्यता आहे. दरम्यान, अर्ज दाखल करण्या साठी सात दिवसांचा अवधी आहे.यापैकी २७ ऑक्टोबरचा रविवार वगळता सहाही दिवस अर्ज भरता येणार आहेत. विशेष म्हणजे हे सहाही दिवस शुभ आहेत. अर्ज माघारीसाठी मात्र दिवाळीनंतरच पडद्यामागच्या हालचालींना वेग येणार आहे.
▪️निवडणूक मग कोणतीही असली तरी स्पर्धेतील उमेदवारां कडून अर्ज भरताना चांगल्या मुहूर्ताची वाट बघितली जाते. चांगला दिवस, त्या दिवसा तील चांगली वेळ याचे गणित बघूनच अर्ज भरला जाण्याची परंपरा आहे. २२ ते २९ ऑक्टोबर या काळात उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आहे. या सात दिवसांत एकच रविवार येतो, अन्य सर्व सहाही दिवस शासकीय सुटी नसल्याने यादिवशी अर्ज भरता येणार आहेत. त्यातही २४ ऑक्टोबर रोजी गुरुपुष्यामृत आहे. हा दिवस शुभ मानला जातो, त्यामुळेच याच दिवशी अर्ज भरण्यासाठी प्रत्येक मतदार संघात गर्दी होण्याची शक्यता आहे. २४ ऑक्टोबरशिवाय २८ व २९ ऑक्टोबर हे दिवसही चांगले आहेत. २८ ऑक्टोबरला वसुबारसने दिवाळीच्या पर्वाला सुरुवात होते, तर २९ ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशी आहे. या दोन्हीही दिवशी अर्ज मोठ्या संख्येने येण्याची शक्यता आहे.
▪️या उमेदवारी अर्जांची छाननी ३० ऑक्टोबरला आहे. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे एक नोव्हेंबरपासून दिवाळी सुरू होत आहे. दोन नोव्हेंबरला (शनिवार) पाडवा, तर तीन नोव्हेंबरला (रविवार) भाऊबीजेची शासकीय सुटी असणार आहे. त्यामुळे या दोन दिवसांत अर्ज माघारीचा शासकीय प्रक्रिया नसेल. मात्र, चार नोव्हेंबरला अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशीच प्रत्येक मतदारसंघात माघारीच्या घडामोडींना वेग येणार आहे.

Author: Team Ratnagiri Vartahar
Official Ratnagiri vartahar Media creators & RV News YouTube Channel.