माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर जीवघेणा हल्ला

.
नागपूर (गुरुदत्त वाकदेकर) : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर नागपूर जिल्ह्यात जीवघेणा हल्ला झाला. ते नरखेडमधील प्रचार सभा आटोपून काटोल येथून तीनखेडा-भिष्णूर मार्गाने परतत होते तेव्हा काही अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या गाडीवर दगडफेक करत हल्ला केला. या हल्ल्यात अनिल देशमुख गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
काल (१८ नोव्हेंबर) अनिल देशमुख यांच्या गाडीवर दगडफेक झाल्याने गाडीची समोरील काच फुटली गेली. या फुटलेल्या काचांचे तुकडे देशमुख यांच्या डोक्याला लागल्याने ते रक्तबंबाळ झाले.
माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख हे सोमवारी सायंकाळी नागपूरजवळील काटोल येथे परतत असताना बेलफाटा येथे त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. देशमुख (वय ७४) यांना उपचारासाठी काटोल येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आणि नंतर नागपूरच्या अॅलेक्सिस सुपर स्पेशालिटी रुग्णालयात हलविण्यात आले. त्यांचे चिरंजीव सलील हे राष्ट्रवादीचे उमेदवार असून देशमुख या भागात पूर्णवेळ प्रचार करीत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या सुप्रिया सुळे यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. त्यांनी भाजपावर हल्ल्याची जबाबदारी घेण्याचा आरोप केला आहे. या घटनेमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचं युवा नेतृत्व रोहित पवार यांनी देखील ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांच्या गाडीवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध केलाव आहे. यातून अनिल देशमुख हे लवकर बरे होतील असा विश्वास व्यक्त केला आहे. तसेच कोणत्याही दबावाला बळी न पडता पोलीस हल्लेखोर आणि त्यामागील मास्टरमाईंड यांच्या मुसक्या आवळतील, ही अपेक्षा देखील व्यक्त केली आहे.
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी ट्विटरच्या माध्यमातून नाराजी व्यक्त केली.’राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या मी तीव्र निषेध करतो. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर जिल्ह्यात एका माजी गृहमंत्र्यांवर प्राणघातक हल्ला होतो यावरून राज्यात कायद्याचे राज्य आहे की गुंडांचे असा प्रश्न पडतो? राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडली असून निष्पक्ष व पारदर्शक निवडणुका होण्यासाठी निवडणूक आयोगाने तात्काळ हस्तक्षेप करून कायदा सुव्यवस्था सुरळीत राहील यासाठी पाऊले उचलली पाहिजेत’, असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले.
गृहमंत्री फडणवीस यांच्या नागपुरात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्याड खुनी हल्ला झाला. फडणवीस आपली यावर काय प्रतिक्रिया आहे? हा राजकीय हल्ला आहे.मुंबईत माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची हत्या होते आणि नागपुरात माजी गृह मंत्र्याला ठार मारण्याचा प्रयत्न होतो. याचा मी निषेध करतो.’ हा राजकीय हल्ला असल्याचं मत देखील शिवसेना (उबाठा) नेते संजय राऊत यांनी नोंदवले.
या घटनेनंतर महाविकास आघाडीच्या समर्थकांनी काटोल पोलिस ठाण्यावर मोर्चा काढून हल्लेखोरांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली. नागपूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार, डेप्युटी एसपी यांनी तपास सुरू केला आहे. या हल्ल्यामागे नेमका कोणाचा हात आहे, याचा लवकरच खुलासा होईल.

Author: Team Ratnagiri Vartahar
Official Ratnagiri vartahar Media creators & RV News YouTube Channel.