पाटपन्हाळे विद्यालयात महापरिनिर्वाण दिन साजरा
आबलोली (संदेश कदम) …
गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे विद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन मुख्याध्यापक व्ही.डी.पाटील यांच्या अध्यक्षतेत नुकताच संपन्न झाला.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुख्याध्यापक व्ही.डी.पाटील , पर्यवेक्षक जी.डी.नेरले , माध्यमिक सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ.एस.एस.चव्हाण , उच्च माध्यमिक सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.सौ.जाधव , ज्येष्ठ शिक्षक एस.बी.मेटकरी आदी. मान्यवर शिक्षकवृंदांसह बहुसंख्य प्राध्यापक – शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून मुख्याध्यापक व्ही.डी.पाटील यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
मान्यवर शिक्षकवृंद यांचे विद्यालयातर्फे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कु.मानसी पालकर , समृद्धी आंबेकर , श्रेया अवेरे , राधा भिडे , कस्तुरी घाणेकर व कस्तुरी वझे या विद्यार्थिनींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन कार्य , दलितांचे मुक्तिदाते , न्याय देणारे अष्टपैलू व्यक्तिमत्व , शिका संघटित व्हा व संघर्ष करा हा दिलेला मूलमंत्र , संविधानाचे महत्व व संविधानासाठी दिलेले योगदान आदी मुद्द्यांनुसार मनोगत व्यक्त केले . विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक एस.एस.घाणेकर यांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे राज्यघटना लेखनासाठी लाभलेले महान योगदान , कौटुंबिक संस्कार व शिस्त , डॉ. आंबेडकरांची विद्वत्ता , डॉक्टर आंबेडकरांची वाचनाची आवड , वाचनानेच मिळविलेले ज्ञान , दृढनिश्चयी व्यक्तिमत्व आदी मुद्द्यांनुसार मार्गदर्शन केले. प्रा. एस.पी.वासनिक यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान लिहिण्यासाठी लाभलेले महान कार्य , शिकणे- वाचन व शिक्षण घेणे ही कार्यप्रणाली , न्याय – समता व बंधुता ही तत्वे , अवांतर वाचनाचे महत्त्व , संघर्षांने मिळणारे सुयश , नागरिकांनी कर्तव्याशी प्रामाणिक राहिले पाहिजे , शिक्षणानेच प्रगती होते आदी. मुद्द्यांनुसार मार्गदर्शन केले. कार्यक्रमाध्यक्ष व मुख्याध्यापक व्ही.डी.पाटील यांनी अभिवादन दिन साजरा करण्याचा हेतू , साजरे करावयाच्या कार्यक्रमांचे महत्त्व , डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक – सामाजिक व राष्ट्रीय कार्य , वाचन व शिक्षण यांमुळेच प्राप्त होणारे ज्ञान व प्रगती , महापुरुषांच्या विचारांचे करावयाचे अनुकरण आदी. मुद्द्यांनुसार मार्गदर्शन करून महापरिनिर्वाण दिनानिमित्त भाषण करणाऱ्या विद्यार्थिनींचे कौतुक केले.
सदरच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिना कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक एस.एम. आंबेकर यांनी केले .मान्यवर शिक्षकवृंद , मार्गदर्शक व विद्यार्थी यांच्या सहकार्याबद्दल एस.वाय.भिडे यांनी आभार मानून कार्यक्रमाचा समारोप केला.

Author: Sandesh Kadam
संदेश कदम, अबलोली. रत्नागिरी वार्ताहर. डिजिटल मिडिया गूहागर तालुका समन्वयक