बदलत्या हवामानामुळे नारळ उत्पादन घटले, श्रीफळ (नारळ) महागले! गृहिणी च बजेट कोलमडणार!
सावंतवाडी : (प्रतिनिधि)देवकार्य, लग्न समारंभ, जेवणासाठी लागणाऱ्या श्रीफळ (नारळ) ने चाळीशी पार केली आहे. महागाईचे चटके सर्व सामान्य माणसाला बसत असताना नारळाचे दरही वाढले आहेत. हवामान बदलाचा परिणाम फळबागांना बसत आहे तोही नारळाच्या झाडाला फटका बसला आहे. त्यामुळे उत्पादन घटले आहे.नारळाचे प्रतिनग दर २० ते ५० रूपये झाल्याने ग्राहकांच्या खिशाला आर्थिक चटका बसत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात नारळाचे दर चाळीशी पार पोहचले असून हा दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्याने रोजच्या जेवणातील नारळाचा वापर आता काहीसा कमी होतांना दिसत आहे. नारळ उत्पादनात कमालीची झालेली घट तसेच नारळाला असलेली मागणी पाहता नारळाचा हे दर वाढले गेल्याचे बागायतदाराकडून सांगण्यात येत आहेत.*
सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार करता या ठिकाणी बागायदाराकडून मोठ्या प्रमाणात नारळाची लागवड करण्यात आली आहे. त्यांच्याकडून गेली कित्येक वर्ष मोठ्या प्रमाणात याठिकाणी नारळाचे उत्पादन घेतले जाते. नारळाच्या उत्पादनासोबतच या ठिकाणी सुपारी,काजू, आंबा आदी उत्पादनातून येथील शेतकरी बागायतदार आपली रोजीरोटी भागवत आहे. गेल्या काही वर्षांत नारळाचे दर कमी जास्त होताना पाहायला मिळत आहेत. निसर्ग चक्र बदलत आहे. बदलते हवामान,असंतुलित पाऊस आणि कीड रोगाचा सातत्याने होणारा प्रादुर्भाव लक्षात घेता. गेल्या काहीत वर्षात नारळाचे उत्पादन निम्यावर येऊन ठेवले आहे. बदलते वातावरणच नारळाच्या उत्पादनाला मारक ठरले आहे. एकुणच याचा परिणाम नारळाच्या दरवावर दिसून आला आहे, असे बागायतदारांचे मत आहे.
गतवर्षी साधारण दहा रुपयाला मिळणारा नारळ आता २५ ते ३० रुपयापर्यंत बाजारपेठेमध्ये विकला जात आहे. तर त्यापेक्षा मोठा नारळ हा ३५ ते ४० रुपयापर्यंत पोहचला आहे. थेट बागायतदाराकडून नारळ घाऊक विकत घेतल्यास हा दर काहीसा कमी मिळत असला तरी बाजारपेठेत असलेले दर मात्र सर्व सामान्यांच्या खिशाला परवडणारे नाही. त्यामुळे सध्या नारळ मोठ्या प्रमाणात भाव खातांना दिसत आहे.
नारळाचे दर यावर्षी मध्यंतरीच्या काळात वीस रुपयांपर्यंत स्थिरावले होते परंतु गणेश चतुर्थी नंतर नारळाचे दर वाढतानाच पाहायला मिळत आहे. जत्रोत्सवाचा हंगामात हे दर ४० रुपयापर्यंत पोहचले असून जत्रोत्सवाला मोठ्या प्रमाणात श्रींची ओटी भरण्यासाठी नारळाची मागणी असते. जत्रोत्सवात नारळ, केळी, फुले आदी व्यापार व्यवसाय करणारे थेट बागायतदारांकडून मोठ्या प्रमाणात नारळाची उचल करतात .याशिवाय जिल्ह्यातील व नजीकच्या गोवा राज्यातील हॉटेल व्यवसायिक यांच्याकडूनही बागायतदारांकडे नारळासाठी मोठी मागणी असते त्यामुळे बागातदारांकडेच नारळ उपलब्ध नसल्याने नारळाचे दर आपसुकच वधारले आहेत.
एकीकडे कडधान्य, खाद्यतेल आदी जेवणातील वस्तूंचे दर आधीच गगनाला भिडले असताना आता जेवणाची चव वाढविणारा महत्त्वाचा घटक असलेला नारळाचा दरही आवाक्याबाहेर गेल्याने सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. वातावरणातील बदलामुळे आणि रोग प्रादुर्भावामुळे नारळ उत्पादनातील ही घट अशीच कायम राहिल्यास नारळाचा दर पुढील काळात निश्चितच सर्वसामान्यांना घाम फोडेल यात शंकाच नसल्याचे बागायतदारांकडून बोलले जात आहे.
नारळ बागेत शेतकरी मशागत करत असतो पण बदलते हवामानाचा फटका बसला तरी लाल तोंडाचे माकड, वानर,शेकरू, उंदीर यांनी देखील बागायतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे वर्षाकाठी तीन वेळा उत्पादन मिळवताना बागायतदार मेटाकुटीला येतो. या सर्व गोष्टींचा परिणाम उत्पादनावर झाला आहे. नारळ उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. तर ग्राहकांच्या खिशाला नारळाचे दर वाढल्याने आर्थिक चटका बसत आहे.अती पाऊस आणि अती भयानक उष्णता तसेच थंडीचा लहरीपणा हे वातावरणातील बदल नारळ उत्पादनाला परिणामकारक ठरले आहे.नारळाला फुलोरा आल्यास मोठ्याप्रमाणात फळगळ होत आहे. थंडीच्या लहरीपणामुळे नारळ झाडाला फुलोराही येत नाही. शिवाय फुलोरा मोडून नारळ झाडाची वाढही खुंटली आहे.
*नारळ उत्पादन घटल्याने दरवाढ!*
नारळ बागायतदार शेतकरी तथा माजी पंचायत समितीचे सभापती प्रमोद सावंत म्हणाले, बदलते हवामान, किड रोग, अतिवृष्टी यामुळे उत्पादनात घट झाली आहे. तसेच वानर,लाल तोंडाची माकडे , उंदीर आणि शेकरू या जंगली प्राण्यांचा उपद्रव वाढला आहे. या प्राण्यांकडून नारळाची मोठ्या प्रमाणात नासधूस होत आहे. बागायतदार वर्षाकाठी तीन वेळा उत्पादन घेण्यासाठी मशागत करून मेहनत घेत आहेत. पण निसर्ग आणि वन्यजीव यांच्यामुळे देखील उत्पादनावर परिणाम होत आहे. नारळाच्या किंमती सध्या ५० रूपये प्रतिनग पर्यंत गेल्या आहेत.