प्रजासत्ताक दिनी संगमेश्वर रेल्वे स्थानकात होणाऱ्या लाक्षणिक उपोषणाला संगमेश्वर तालुक्यातील जनतेचा वाढता प्रतिसाद
संगमेश्वर– मडगाव, जामनगर, पोरबंदर या एक्स्प्रेसला संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकावर थांबा मिळावा यासाठी निसर्गरम्य चिपळूण संगमेश्वर फेसबुक ग्रुपच्या वतीने पुकारलेल्या लाक्षणिक उपोषणाला संगमेश्वर तालुक्यातून सर्व स्तरांतून उस्फुर्त पाठिंबा मिळत आहे.
निसर्गरम्य चिपळूण संगमेश्वर फेसबुक ग्रुपचे प्रमुख, पत्रकार संदेश जिमन आणि त्यांचे सहकारी सर्व नियम पाळून आंदोलन करणार आहेत. या आंदोलनात संगमेश्वर तालुक्यातील सर्व राजकीय, सामाजिक, रिक्षा संघटना, व्यापारी संघटना, ग्रामविकास मंडळे आणि तालुक्यातील सर्व सामान्य जनतेने पाठिंबा देत कोकण रेल्वे आणि रेल्वे प्रशासनाची तारांबळ उडवून दिली आहे. आजवर कोकण रेल्वेने वेळोवेळी थातूरमातूर कारणे देत वेळकाढूपणा केला. त्यामुळे हा आंदोलनाचा मार्ग संगमेश्वर तालुक्यातील जनतेला स्वीकारावा लागला आहे. २३ जुलै २०२४ रोजी कोकण रेल्वेच्या मुख्य प्रवर्तक यांच्या सोबत आमदार शेखर निकम आणि निसर्गरम्य चिपळूण संगमेश्वर फेसबुक ग्रुपचे निवड लोकांची बैठक झाली.
या बैठकीत कोकण रेल्वे चे व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांनी या मागणीकडे स्वतः लक्ष घालून तो प्रस्ताव सकारात्मक स्वरूपात पुर्ण होण्याचे संकेत दिले. परंतू सहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर पत्र देऊन यापूर्वी म्हणजे दोन वर्षांपूर्वी दिलेल्या एक्स्प्रेस गाड्यांचा उल्लेख केला व सद्यस्थितीत मागणी करण्यात आलेल्या तीन एक्स्प्रेसना थांबा देण्यास असहमती दर्शवली. कोकण रेल्वेला संगमेश्वर तालुक्यातील जनतेकडून करोडो रुपयांची उलाढाल प्रती वर्षी होते. तरीही रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी संगमेश्वर तालुक्यातील जनतेवर अन्याय का केला? हा प्रश्न गंभीर मुद्दा बनला आहे. या तालुक्यातील जनतेला गावाकडे जाता येताना सदोदित हाल अपेष्टा सहन कराव्या लागतात. या तिन्ही गाड्या दिवसाच्या स्थानकात येतात. त्यामुळे या गाड्या संगमेश्वर तालुक्यातील जनतेला फायदेशीर ठरून प्रवास सुखकर होईल.
मात्र मागण्या अमान्य झाल्याचे संगमेश्वर तालुक्यातील जनतेला कळले. त्यानंतर परीस्थिती खूप बदलली आहे. सर्व स्तरांतून आंदोलनाला पाठिंबा मिळतो आहे. ही गोष्ट कोकण रेल्वेची डोकेदुखी तर वाढवणारी नसेल ना? हे आता आगामी काळात स्पष्ट होईल. असे असले तरी आपण सुरू केलेले आ़दोलनात कायदा आणि संविधानाचा सन्मान राखला जाईल असे मत पत्रकार संदेश जिमन यांनी व्यक्त केले आहे. तथापि या आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न कुणी केला तर त्याला जबाबदार कोकण रेल्वेचे अधिकारी असतील असेही ते पुढे म्हणाले. येत्या प्रजासत्ताकदिनी संगमेश्वर स्थानकात तालुक्यातील तमाम राजकीय, सामाजिक, वाहतूक, व्यापारी संघटना व कार्यकारी मंडळे यांच्या पाठिंब्यामुळे प्रशासनावर अतिरिक्त भार पडणार आहे. परंतु हा लढा सामान्य जनतेच्या हितासाठी, हक्कासाठी आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे, असे जिमन यांनी म्हटले आहे.

Author: Team Ratnagiri Vartahar
Official Ratnagiri vartahar Media creators & RV News YouTube Channel.