आता वारसा नोंद होणार ऑनलाईन; तलाठी कार्यालयातील हेलपाटे वाचणार
मुंबई – नवीन वर्षात राज्य सरकारकडून नागरिकांना एक मोठं गिफ्ट देण्यात आले आहे. नागरिकांना आता ऑनलाईन वारसा नोंद करता येणार आहे. नागरिकांना ई-फेरफार प्रणालीला पूरक असलेल्या ई-हक्क प्रणालीचा (पब्लिक डाटा एन्ट्री) वापर करून वारस नोंद, सात- बारावरील इकरार नोंदी, मयतांचे नाव कमी करणे, अपाक कमी करणे आदी विविध कामे करता येणार आहे. त्यामुळे नागरिकांना तलाठी कार्यालयात हेलपाटे मारण्याची गरज भासणार नाही.
वारस नोंद, बोजा दाखल करणे, बोजा कमी करणे, इकरार नोंदी, मयताचे नांवे कमी करणे, अपाक कमी करणे, विश्वस्तांचे नाव कमी करणे वा इतर महसूल कामासाठी नागरिकांना तलाठी कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत होते. अनेकदा एकाच तलाठ्याकडे दोन-तीन गावाचा पदभार असल्याने त्याची आणि नागरिकांची भेट होत नाही. तलाठी आठवड्यातील वार ठरवून येत असला तरी बैठकी आणि इतर व्यापामुळे त्याचा खाडा पडतो. अशावेळी नागरिकांची कामं खोळंबतात. यावर तोडगा म्हणून सरकारने ही प्रक्रिया ऑनलाईन केली आहे.
असा करा अर्ज
ई-हक्क प्रणाली आधारे नागरिकांना वारसा नोंद करता येईल. ई-फेरफार आधारे तलाठ्यांना हे काम करता येईल.
pdeigr.maharshtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन नागरिकांना सहकारी संस्थांना अगोदर लॉगिन करावे लागेल. त्यासाठी अगोदर साईन-अप, नोंदणी करावी लागेल. त्यानंतर वारस नोंद, बोजा दाखल करणे, बोजा उतरवणे, इकरार नोंदी, मयताचे नावे कमी करणे इतर कामे करता येणार आहेत.
ई-हक्क प्रणालीचा वापर करून आठ प्रकारच्या नोंदी घरबसल्या करता येणार आहेत.
घरबसल्या आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करावी लागतील. नागरिक स्वतः या प्रणाली आधारे अथवा महा ई-सेवा केंद्रातून अर्ज करू शकतात.
या प्रणालीच्या वापराने तलाठ्यांवरील ताण कमी होणार आहे. तसेच महसूल प्रशासनाच्या कामकाजामध्ये गतिमानता आणि पारदर्शकता येईल.
…………………………………..

Author: Team Ratnagiri Vartahar
Official Ratnagiri vartahar Media creators & RV News YouTube Channel.